Wednesday, 13 February 2019

राष्ट्रीय रुरबन अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे





राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत नियामक समितीची सभा संपन्न
       जळगाव, दि. 13: राष्ट्रीय रुरबन अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करताना पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते आदी विषयांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिले.
            राष्ट्रीय रुरबन अभियानातंर्गत नियामक समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा ग्रामीण विकस यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, आदींसह मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, की राष्ट्रीय रुरबन अभियानातंर्गत गावात कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी  प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम,  मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्च शिक्षण सुरक्षा, स्वच्छता, नळाव्दारे पाणी पुरवणे, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत गटार, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक, एल पी जी गॅस कनेक्शन, डिजिटल साक्षरता व नागरिक सेवा केंद्रांचा प्रस्ताव संबंधित विभागांनी तयार करुन गाव समुहांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या  योजना व राज्य शासनाच्या योजना नियोजनबध्द पध्दतीने एक केंद्राभिमुख रितीने व विशिष्ट कालमर्यादेत सादर करावा.
या अभियानात प्रामुख्याने आर्थिक व तांत्रिक सोयी सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करुन देणे, ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करताना गरीबी व बेरोजगारी कमी करणे, अभियानांतर्गत निवडलेल्या भागाचा सर्वांगीण विकास करणे व ग्रामीण भागातील गुंतवणूकीस चालना देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी  सांगितले.
0000

No comments:

Post a Comment