Sunday, 24 February 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ जिल्हयातील 2 लाख 27 हजार 743 शेतकरी कुंटूबाना योजनेचा लाभ मिळणार




      जळगाव : दि.24:-  शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय  शुभारंभ आज दिनांक  24 फेब्रूवारी 2019 रोजी  ममुराबाद जि.जळगाव येथील कृषि विज्ञान केद्रात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी  डॉ.अविनाश ढाकणे  यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

         यावेळी  आमदार सुरेश भोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर कृषि उपसंचालक अनिल भोकरे एन.आय.सी.चे प्रमुख प्रमोद बोरोले, महात्मा फुले कृषि विज्ञान पिठाचे डॉ. सुदाम पाटील कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.बाहेती,नाबाडचे श्रीकांत झांबरे, खते, कृषि बियाणे विक्रेते ,प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेले शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

         जिल्हा प्रशासनासह कृषि, महसूल, कृषि विज्ञापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम 79.52 टक्के पुर्ण झाले असुन लवकरच  पात्र शेतक-यांच्या  खात्यात  थेट निधी जमा  करण्यात येणार असल्याचे सांगुन जिल्हाधिकारी श्री. डॉ.अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की,  शेतक-यांनी अभिनव पध्दतीचा वापर करावा.  पाण्याचे योग्य नियोजन करून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळण्यासाठी  प्रयत्नशील राहावे. शेतक-यांच्या सन्मानासाठी ही योजना आहे. शेवटच्या  लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी  शासन कटिबध्द आहे. शेतक-यांच्या खात्यात  निधी पोहचविण्यासाठी  काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी  ग्राम पातळीवर,  तालुका पातळीवर,  जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करावी असेही त्यांनी सांगितले.

     2 लाख 27 हजार 743 शेतकरी कुंटूबीयांच्या  खात्यात  प्रधानमंत्री किसान  सन्मान निधी योजनेचा लाभ पोहचणार आहे. हा निधी लाभार्थ्यांनी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढीसाठी, अडिअडचणीसाठी खर्च करून तो सत्कार्मी लावावा असे सांगून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून  योजनेची माहिती सांगितली. 

         ही योजना राज्यात दिनांक 1 डिसेंबर 2018 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.  योजनेतंर्गत  विहित  निकषांप्रमाणे ज्या कुटंबाचे  (पती , पत्नी  व त्याची 18 वर्षाखालील अपत्ये) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक  2 हेक्टर पर्यंत  क्षेत्र असलेल्या शेतकरी कुंटबियांस  2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे दरवर्षी 3 हप्त्यात 6 हजार रूपयापर्यंत लाभ मिळणार आहे.   या योजनेचा पहिला हप्ता   31 मार्च पर्यंत    शेतक-यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.

            गावपातळीवर  पात्र शेतक-यांच्या कुंटूबीयांचे  निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी शेतक-यांचे नाव, लिंग, प्रवर्ग, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख याबाबतची  माहिती शेतक-यांनी  दयावयाची आहे. तसेच सामाईक कुटूंबातील एक सदस्यांनी योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा  करण्यासाठी स्वयं घोषणापत्र दयावयाचे आहे. लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोटर्लवर  अपलोड केली जाणार आहे.  त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीव्दारे  निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या असुन त्यानुसार  योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व स्वागतपर भाषणात डॉ. बाहेती यांनी  कार्यक्रमाची सविस्तरपणे रुपरेषा  सांगून उपस्थित शेतकऱ्यांना योजनेची माहिती सांगितली.

            प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ गोरखपुर, उत्तर प्रदेश येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आधुनिक पध्दतीचा वापर करून डीजीटल पध्दतीने करण्यात आले. त्याचे थेट प्रक्षेपण देशवासीयांना दाखविण्यात आले. तसेच मन की बात या कार्यक्रमाच्या प्रसारणामध्ये प्रधानतंत्री नरेंद्र मोदी यांनी शहीद जवान तसेच शेतकऱ्यांबद्दल गौरवोदगार काढले.

                                                               **************

No comments:

Post a Comment