Saturday, 29 June 2019

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर


            जळगाव, दिनांक 6 :- अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा.  विशेषत: 6 महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाचे काम  प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर दिल्यात.
            जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
            बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त डी.जी.नांदगावकर, उप पोलीस अधिक्षक, अमळनेर राजेंद्र ससाणे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक पी.सी.शिरसाठ, एकात्मिक आदिवासी विकास योजनेचे प्रकल्प अधिकारी व्ही.एम.गाढे, पोलीस निरीक्षक राजेंशसिंह चंदेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस.सपकाळे, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
            अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर पुढे म्हणाले की, न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन सदरची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. विशेषत: सहा महिन्यांपेक्षा प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी पर्यायाने पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. पोलीस तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. अत्याचार पिडितांना नियमानुसार अर्थसहाय मंजूर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना  बैठकीत दिल्यात.
            प्रारंभी  समाज कल्याण‍ विभागाचे सहायक आयुक्त डी.जी.नांदगावकर  यांनी माहे मे अखेरचे 33 व एप्रिल अखेरचे 31 असे एकूण 64 गुन्हे पोलीस तपासावर असून एप्रिल 2019 ते मे-2019 अखेर 64 प्रकरणांमध्ये 14 पिडीतांना अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले आहे. तसेच एप्रिल 2019 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 3 पिडीतांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. तसेच मे-, 2019 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 6 पिडीतांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. मे अखेर पर्यंत आरोपपत्र दाखल झाल्यानंतर एकूण 9 लाभार्थ्याना 9 लाख 31 हजार 250 रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली.
             याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रकरण निहाय गुन्ह्यांचा़ आढावा घेवून प्रकरणे लवकरात-लवकर निकाली काढून पिडीतांना तात्काळ न्याय देण्याचा प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना सर्व संबंधितांना दिल्यात.
000

तलाठी भरती परिक्षा केंद्राच्या बैठक व्यवस्थेबाबत


            जळगाव दि. 29 :- महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठ्या प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत शासन धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सदर भरती प्रक्रिया महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान विभाग) ह्या शासकीय विभागाच्या माध्यमातून ई-महा परिक्षा या पोर्टलवरुन करावयाची आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या आखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गांतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महा-आयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
            सदर परिक्षा पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरिक्षा मार्फत होत आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परिक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा, कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात येऊन त्यात जळगाव जिल्ह्यात एकूण खालील पाच परिक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
            सदर परिक्षा दि. 2 जुलै, 2019 ते 26 जुलै, 2019 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
            उपकेंद्राचे नांव व परिक्षार्थीची संख्या (कंसात) पुढील प्रमाणे :- जी.एच.रायसोनी इन्स्टिटयुट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड मॅनेजमेंट, गट नं. 57 शिरसोली रोड मोहाडी, जळगाव – (4760), इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट, ॲण्ड रिसर्च, (आय.एम.आर.), नॅशनल हायवे क्रमांक 6, जिल्हा उद्योग केंद्रामागे, गणेश कॉलनी, जळगाव (1431), जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग जिवराम नगर, फैजपूर ता. यावल, जि.जळगाव (3600), केसीई कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी, नॅशनल हायवे क्रमांक 6, जिल्हा उद्योग केंद्रामागे, गणेश कॉलनी, जळगाव (3601) आणि श्री. संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नोलॉजी, झेडटीसी भुसावळ,ता. भुसावळ, जि.जळगाव (6570) असे एकूण 19962 इतकी आहे.
            प्रत्येक परिक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मुळ फोटो ओळखपत्र (Original Photo Id) आणणे अत्यावश्यक आहे. पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती (Driving Liceence), मतदान ओळखपत्र, मुळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक, आधार कार्ड. ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, e-Aadhar Card आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैद्य ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारले जाणार नाही. अशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकटीवर देण्यात आल्या आहेत.
            महापरिक्षा पोर्टल वरुन घेतल्या जाणाऱ्या परीक्षा चालू असताना नियमांचे पालन व काही गैरप्रकार होणार नाही.  यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परिक्षा केंद्रावर निरीक्षक (Observer) म्हणून नायब तहसिलदार यांच्या व महाआयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परिक्षा नियंत्रक (Exam Controller) म्हणून श्री. बाळासाहेब पारधे, उप विभागीय अधिकारी, मुंबई उपनगर यांची नियुक्त करण्यात आलेली आहे.
            महापरिक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटावरील सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ह्या संदर्भात अधिक माहिती, तक्रार नोंदविण्यासाठी महापरिक्षा टोल फ्री क्रमांक 1800 3000 7766  व enquiry@mahapariksah.gov.in ह्या मेलवर संपर्क साधण्याबाबत सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येत आहे. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव आणि अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000

निवृत्ती वेतनधारकांच्या जुन महिन्याच्या वेतनास विलंब होणार


            जळगाव, दि. 29 :- जिल्ह्यातील कोषागारातंर्गत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना राज्य शासनाच्या आदेशानुसार निवृत्तीवेतन धारकांच्या जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीच्या सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता प्रदान करण्याचे कामकाज चालु आहे.
            तथापी संगणक प्रणालीमध्ये वरिष्ठ स्तरावर सुधारणा करत असल्यामुळे माहे जुन-2019 देय जुलै-2019 चे निवृत्तीवेतन प्रदानास तीन ते चार दिवस विलंब होण्याची शक्यता आहे. याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन कोषागार अधिकारी श्री. प्र. सि. पंडीत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

सांख्यिकी दिवस उत्साहात साजरा







            जळगाव, दि. 29 :- प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस या विख्यात संख्याशास्त्रज्ञाच्या जन्मदिवस 29 जून हा सांख्यिकी दिन म्हणून  साजरा केला जातो.
            प्रा. महालनोबीस हे देशाच्या नियोजन आयोगाचे सदस्य होते, तसेच त्यांनी कलकत्ता येथे भारतीय सांख्यिकी संस्था या संस्थेची स्थापना केली. दुसरी पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये त्यांचा महत्वपुर्ण सहभाग होता. भारत सरकारचे ते सांख्यिकी सल्लागार होते. सांख्यिकी मुळे देशाचे नियोजन कशा प्रकारे करता येते हे त्यांनी दाखवुन दिले. त्यांच्या आयुष्यभराच्या महत्वपुर्ण कामगिरीमुळे भारत सरकारने त्यांना सन 1968 मध्ये पद्मविभुषण पुरस्कार देऊन गौरविले होते.
            दरवर्षीप्रमाणे 29 जुन सांख्यिकी दिवस नियोजन विभागाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. नियोजन विभागाच्या जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत, जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव पाटिल, जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वाय. पी. पाटील ( विभाग प्रमुख संख्याशास्त्र विभाग, नुतन मराठा कॉलेज, जळगाव ), श्री. विलास मोराणकर (उप व्यवस्थापक, गुणवत्ता नियंत्रण, FBML, जळगाव) व श्री. सुनिल चौधरी (प्रशिक्षक SPEED MATHS, जळगाव) उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पूजन व दिप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
            डॉ. वाय. पी. पाटील व श्री. विलास मोराणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात औद्योगिक व व्यवहारीक जीवनातील सांख्यिकीच्या महत्वावर प्रकाश टाकला. यानंतर श्री सुनिल चौधरी यांनी शाश्वत विकासाची ध्येयांतर्गत जीवन आणि पाणी व आरोग्य या विषयांवर यथोचित मार्गदर्शन केले.  श्री. कि. नि. पाटील ( निवृत्त उपायुक्त नियोजन ) यांनी नियोजन प्रक्रियेतील सांख्यिकीच्या महत्वावर भाषण दिले.
            जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. प्रमोदराव पाटील यांनी प्रा. महालनोबीस यांच्या जीवनपटाबद्दल माहिती सांगितली.  शेवटी  श्री. प्रतापराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात प्रशासकीय कामकाजातील सांख्यिकीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
            याप्रसंगी श्री. पी. व्ही.  ठोंबरे (जे. टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालय, फैजपुर ), श्री. एम. पी.  चौधरी (जे. टी. महाजन अभियांत्रीकी महाविद्यालय, फैजपुर ), श्रीमती. अलकनंदा पवार, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी, श्री. प्रमोद साठे, संशोधन सहायक, तसेच संचालनालयांतर्गत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. चेतन देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीमधील  सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
0000

Friday, 28 June 2019

रामदेववाडी येथे 1 जुलै रोजी जिल्हास्तरीय वृक्षारोपणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव, दिनांक 28 - महाराष्ट्र शासनाच्या एकच लक्ष 33 कोटी वृक्ष लागवड या अभियानांतर्गत सोमवार 1 जुलै, 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाक्षक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते रामदेववाडी, वावडदा रोड, जळगाव येथे वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राहणार  आहेत. तर कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. श्रीमती उज्वला पाटील, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेश पाटील, आमदार डाॅ. सुधिर तांबे, आमदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सर्वश्री. चंदुलाल पटेल,  किशोर दराडे, एकनाथराव खडसे, डॉ. सतिश पाटील, संजय सावकारे, हरीभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांचेसह मुख्य वनसंरक्षक धुळे श्री. ए. एस. कळसकर, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. प्रकाश मोराणकर, विभागीय वन अधिकारी सामाजिक वन विभाग, जळगाव श्री. सै. ई. शेख, सहायक वनसंरक्षक श्री. चि. रा. कांबळे, श्री. के. आर. फंड, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एन. जी. पाटील आदि उपस्थित राहणार आहेत.

वृक्षारोपणाच्या शुभारंभ कार्यक्रमात रामदेववाडी येथे 2 हेक्टर क्षेत्रावर 3200 रोपांचे रोपण करण्यात येणार असून त्यासाठीचे सर्व खड्डे खोदून तयार झाले आहेत. वृक्षारोपण हे  राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी 1 जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार यांनी केले आहे.

                                                                    0000

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे जिल्हा दौऱ्यावर

जळगाव, दि.28 - महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे हे 1 व 2 जुलै, 2019 दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहे.  न्यायमुर्ती भंगाळे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.

सोमवार 1 जुलै, 2019 रोजी    महानगरी एक्सप्रेसने सकाळी 6.40 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव.

मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 11.15 वाजता 12112 अप अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण .

                                                                       000

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न पदार्थ देणेबाबत प्रबोधन

जळगाव, दिनांक २८ - जंक फूड खाण्याकडे मुलांचा कल वाढत असून त्यामुळे आजार बळावू लागले आहेत.  त्यामुळेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जंक फुडपासून दूर ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाने पाऊल उचलले आहे.

शाळा, कॉलेजच्या कँटीनच्या मेनूमध्ये आवश्यक बदल करुन विद्यार्थ्यांना सकस आणि संतुलित आहार उपलब्ध करुन देण्याविषयी प्रशासनाच्या आयुक्त श्रीमती पल्लवी दराडे यांनी  हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाने जळगाव जिल्ह्यातील 911 शाळा, कॉलेजला याबाबत लेखी कळविले आहे.

या विशेष मोहीमेत अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी विविध तालुक्यातील शाळा व कॉलेजच्या मुख्याध्यापकांच्या प्रत्यक्ष भेटी द
घेवून कँटीनमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन केले जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून पालक वर्गाला देखील याबाबत जागरुक केले जात असल्याची माहीती अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. यो. कों. बेंडकुळे यांनी दिली आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून 27 जून रोजी प.न.लुंकड कन्या शाळा, जळगाव येथे जिल्ह्यातील खाजगी शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांची शिक्षणाधिकारी, जळगाव यांच्या उपस्थितीत सभा घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे शाळामध्ये जंक फुड, फास्ट फुड मुलांना देण्यात येवू नये, तसेच त्यांचे शाळांमधील मेनू तसेच कँटीन असल्यास कँटीनमधील अन्नपदार्थ हे दर्जेदार व पोषक असावेत. मुलांना भोजनात परीपूर्ण व पोषक आहार तसेच सुरक्षितअन्न मिळावे याबाबत तसेच स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

याकरिता अन्न व  औषध प्रशासनातील अधिकारी विवेक पाटील, किशोर साळुंके, सुवर्णा महाजन हे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात प्रत्यक्ष भेटी देत आहेत.

                                                                     0000