Tuesday, 11 June 2019

बॅकांनी शेतकरी हितास प्राधान्य द्यावे - खासदार रक्षाताई खडसे


            



        जळगाव, दि. 11 - निसर्गाचा अलहरीपणा व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता बँकांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्जाचे वाटप करावे. बँकांच्या अडवणूकीच्या धोरणामुळे कोणीही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सुचना खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिल्यात.
            केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी श्रीमती खडसे बोलत होत्या. या बैठकीस खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील आदि उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना खासदार खडसे म्हणाल्या की, शासनाच्या अनेक योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागत आहे. या योजनांच्या लाभासाठी शेतकरी व नागरीक ऑनलाईन अर्ज करण्यास जातात त्यावेळी सर्व्हरमध्ये अडचणी येत असल्याने ऑनलाईन अर्ज भरले जात नाही. अर्जाची मुदत संपल्याने शासनाच्या योजनांपासून लाभार्थी वंचित राहतात. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध व्हावे याकरीता बँकांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदतीचे धोरण ठेवावे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जनजागृती करावी. तसेच पीकनिहाय पीक विम्याचे दर प्रत्येक सहकारी सोसायटीच्या बाहेर लावण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. नागरीकांना गावातच बँकीग सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बँकांच्या शाखा वाढविण्याचे प्रस्ताव तयार करावे. सावदा व हिंगोणा येथील रेल्वे उडडाणपूलासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा. पाचोरा-जामनेर-बोदवड मार्गे मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करावा. यावेळी त्यांनी जळगाव व भुसावळ पासपोर्ट कार्यालयाचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील दळणवळणास चालना मिळण्यासाठी
रस्ते व रेल्वेची कामे तातडीने पूर्ण करा- खासदार उन्मेश पाटील
            जिल्ह्यातील दळणवळणास चालना मिळावी. जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यात सुरु असलेली राष्ट्रीय व राज्य महामार्गांची तसेच रेल्वेची कामे तातडीने पूर्ण करावी. अशा सुचना खासदार उन्मेश पाटील यांनी सर्व संबंधितांना दिल्यात. जळगाव-चाळीसगाव, जळगाव-औरंगाबाद, जळगाव-धुळे, चाळीसगाव-नांदगाव या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे. त्याचबरोबर जळगाव शहरातून जाण्याऱ्या राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी महानगरपालिका व महावितरण कंपनीने इलेक्ट्रीक पोल, पिण्याचे पाण्याची व सांडपाण्याची पाईप लाईन शिफ्टींगचे नियोजन लवकरात लवकर करावे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळावी. याकरीता पुरातत्व विभागाकडे असलेल्या जिल्ह्यातील 11 वास्तूंचे संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करावा. याठिकाणी पर्यटकांना द्यावाच्या मुलभूत सुविधांचा आराखडा तयार करावा. जळगाव शहरात सुरु असलेल्या अमृत पाणीपुरवठा व मल:निस्सारण योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच चाळीसगाव – औरंगाबाद रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करण्याची सुचनाही खासदार पाटील यांनी केली.
            त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात रेल्वेच्या जळगाव-मनमाड तिसरी रेल्वे लाईन, जळगाव-भुसावळ तिसरी व चौथी लाईनची कामे सुरु आहे. तसेच जामनेर-पहूर शटल सेवा सुरु करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. तसेच भुसावळ, कजगाव व शिवाजीनगर येथे रेल्वे उ्डडाणपूल उभारणत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव-चाळीसगाव महामार्गावरील पुलांची कामे तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी
        जळगाव-चाळीसगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. पावसाळ्यात नागरीकांची गैरसोय होवू नये यासाठी या मार्गावरील लहान मोठ्या पुलांची कामे तातडीने  पूर्ण करावी. तसेच जेथे बाह्यवळण रस्ता आहे. तेथे पावसाळ्यात अडचण येवू नये यासाठी या रस्त्यांचे मजबूतीकरण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच पोस्टामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या पोस्टल बँकामध्ये शून्य बॅलेन्सवर आधारित शेतकऱ्यांचे खाते उघडता येऊन शेतकऱ्यांना‍ मिळणारी अनुदानाची व इतर रक्कम या खात्यांवर जमा करता येईल काय याबाबत डाक विभागाने अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
            या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी  घरे, नागरीकांना केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध लाभाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
            या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, महावितरणचे श्री. शेख, भुसावळचे उपविभागीय अधिकारी  श्रीकुमार चिंचकर, फैजपूरचे डॉ. अजित थोरबोले,  राष्ट्रीय महामार्गचे श्री. शिंदे, पुरातत्व विभागाचे श्री. दानवे, रेल्वे चे श्री. रोहित मोरे आदिसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                          000

No comments:

Post a Comment