Monday, 18 March 2019

जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन संपन्न आर्थिक व्यवहाराप्रमाणे पाणी वापराचे नियोजन करणे काळाची गरज - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे


  जळगाव, दि. 16 - पाण्याचे महत्व पैशांपेक्षाही जास्त आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे पाण्याचे दुर्भिक्ष व टंचाई लक्षात घेता आपण ज्याप्रमाणे पैसे खर्च करण्याचे नियोजन करतो. त्याचप्रमाणे पाण्याच्या वापराचेही नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. 
  जलसंपदा विभाग, जैन इरिगेशन व नीर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जलजागृती सप्ताहानिमित्ताने जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता व प्रशासक सुनिल वंजारी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेद्र बेहेरे, नीर फाऊंडेशनचे सागर महाजन विजय पाठक, प्रमोद बऱ्हाटे आदि उपस्थित होते. 
  जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, मी स्वत: पाण्याची टंचाई असलेल्या भागातील असल्याने मला पाण्याच्या समस्येबद्दल चांगली कल्पना आहे. पाण्याच्या समस्येकडे सामाजिक संकट म्हणून बघितल्यास त्यावर मात करणे कठीण नाही. पाणी वापराचे आतापासूनच व्यवस्थित नियोजन केल्यास भविष्यातील पाणीटंचाईमुळे होणारे गावा-गावातील तंटे टाळता येतील. शिवाय पिण्याच्या पाण्याबरोबरच  शेतीला मुबलक पाणी मिळाल्यास देशही सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या हस्ते कलशपुजन करुन जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.  
  महानगरपालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी आपल्या मनोगतात पाण्याचे महत्व विशद करतांना प्रत्येक सजीव व्यक्तीला जगण्यासाठी पाणी महत्वर्पूण आहे. त्यामुळे पाण्याचा वापर आवश्यकतेनुसारच केला पाहिजे. पाण्याचा अमार्याद वापर म्हणजे सामाजिक अपराध ही भावना सर्वांच्या मनात बिंबण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. 
               कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी आपल्या मनोगतात पाणी समस्येकडे समाजाने दुर्लक्ष केल्यास कदाचित जगात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मानवाने आपल्या भौतिक सुखांसाठी सुरू ठेवलेला पाण्याचा वारेमाप वापर थांबविण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. 
  यावेळी विजय पाठक, सागर महाजन, प्रमोद बऱ्हाटे यांची समायोचित भाषणे झालीत.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापिका अपूर्वा वाणी यांनी तर आभार प्रदर्शन गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र बेहेरे यांनी मानले.  या कार्यक्रमास जलसंपदा व इतर विभागांचे अभियंते, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जलजागृती सप्ताहाची सुरुवात जलदिंडीने बाबा झुलेलाल मंदीर, सेवा मंडळ, सिंधी कॉलनी येथून करण्यात आली. त्यानंतर जलदिंडी मंगल वाद्याच्या सुरात पंचमुखी हनुमान मंदिर, इंडिया गॅरेज, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पोहोचल्यानंतर जलदिंडी मधील कलशांचे एकत्रीकरण करुन महाकलशाचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे हस्ते पुजन करण्यात आले. 
                                                                              000

No comments:

Post a Comment