Monday, 11 March 2019

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे






            जळगाव, दि. 11 - भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून ही आचारसंहिता 27 मे, 2019 पर्यंत लागू राहणार आहे. या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपमाला चौरे, शरद पवार, राजेंद्र कचरे, अजित थोरबोले, श्रीकुमार चिंचकर यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
            जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, निवडणूक कालावधीत प्रशिक्षण हा अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी समजून घ्यावी. व त्यानुसार कार्यवाही करावी. जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेण्याकरीता आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा.  संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून अहवाल सादर करावेत. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर मतदान केंद्राच्या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करावी. लाऊडस्पीकर व वाहनांचा वापर करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या सर्वांना समान न्याय तत्वावर देण्यात याव्यात.
            आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी C-Vigil या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर 100 मिनिटात कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे आदी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी PwD या ॲपचा उपयोग होईल, त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सुविधा व सुचनांचेही प्रत्येकाने पालन करुन ही निवडणूक सर्वांनी एकत्रित मिळून शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
            लोकसभा निवडणूका निर्भय व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी निवडणूक काळात उपद्रव निर्माण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईचे जे प्रस्ताव सादर केले आहे. त्यावर संबंधितांकडून त्वरीत कार्यवाही व्हावी. जेणेकरुन पोलीस विभागास पुढील कारवाई करणे सोईचे होईल.  
            निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कदम यांनी सांगितले, शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर करू नये. शासन, सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, आदींचा वापर त्याच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटिसा चिटकवणे किंवा घोषणा आदी लिहिण्यासाठी वापर करता येणार नाही. यामध्ये खासगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल, असेही त्यांनी नमूद केले.
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने  आचारसंहितेचे पालन होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
000

No comments:

Post a Comment