·
जिल्ह्यातील दुष्काळी 1003 गावांसाठी 1620 उपायोजनांचा 36.24 कोटी रुपयांचा आराखड्यावर तयार
·
जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार 512 शेतकऱ्यांच्या खात्यावर 246 कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान जमा
·
जिल्ह्यात खरीप, रब्बी हंगाम व गाळपेऱ्यावर करण्यात आलेल्या चारा लागवडीतून 13 लाख 78 हजार 889 मे. टन चारा उपलब्ध होणार
·
जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेतंर्गत 1163 कामे सुरु, या कामांवर 6159 मजूर काम करीत असून सेल्पवर 17691 कामे
·
जिल्ह्यात 69 गावांसाठी 47 टँकर सुरु
·
जिल्ह्यातील 8557 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपयांची पीक विम्याची भरपाई मिळाली
·
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 55 हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड
जळगाव, दि. 8 - भविष्यातील टंचाईची परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांना मुबलक पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम देणे. या त्रिसुत्रीवर आधारित उपाययोजना सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच तयार कराव्यात. विशेषत: पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्याबरोबर त्याची तातडीने पडताळणी करुन मंजूरी द्यावी. असे निर्देश महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झाली, यावेळी ना. पाटील बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे श्री. मोराणकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांचेसह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, वीजबील न भरल्यामुळे जिल्ह्यातील एकही पाणीपुरवठ्याची योजना बंद करु नये. तसेच शेतकऱ्यांची कर्जवसुली तातडीने थांबवावी. दुष्काळी भागासाठी पाण्याचे नवीन स्त्रोत शोधून ते कार्यानि्वत करावे. टँकरद्वारे नागरीकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची शुध्दताही तपासण्याबरोबरच भविष्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्यास संबंधित यंत्रणांकडून घेण्याची सुचनाही पालकमंत्र्यांनी केली.
या बैठकीत सध्या जिल्ह्यातील दुष्काळी भागातील 1003 गावांसाठी सुचविण्यात आलेल्या 1620 उपायोजनांसाठी तयार करण्यात आलेल्या 36.24 कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. सध्या जिल्ह्यात 69 गावांसाठी 47 टँकर सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर जिल्ह्याला जुलै 2019 पर्यंत 14 लाख 33 हजार मे. टन चारा लागणार असून सध्या जिल्ह्यात खरीप, रब्बी हंगाम व गाळपेऱ्यावर करण्यात आलेल्या चारा लागवडीतून 13 लाख 78 हजार 889 मे. टन चारा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात चारा छावण्यांची आवश्यकता भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. रोजगार हमी योजनेतंर्गत सध्या जिल्ह्यात 1163 कामे सुरु आहेत. या कामांवर 6159 मजूर काम करीत असून सेल्पवर 17691 कामे असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन मागेल त्याला मजूरी देण्याचे धोरण अवलंबिण्याची सुचनाही पालकमंत्री यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर जिल्ह्याला दुष्काळाच्या अनुदानासाठी 585 कोटी रुपये मंजूर झाले असून 404 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. त्यापैकी 3 लाख 52 हजार 512 शेतकऱ्यांच्या खात्यावर 246 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी बैठकीत दिली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 8557 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये पीक विम्याची भरपाई मिळाली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लाख 55 हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आल्याचे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
000
No comments:
Post a Comment