* 2 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या उपसासिंचन
योजनेमुळे 55 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
येणार
* भागपूर उपसासिंचन योजनेचे दोन वर्षात पूर्ण
करणार
* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून
पालकमंत्र्यांच्या हस्ते महिलांचा सत्कार
जळगांव, दि. 8 -
जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा व जळगांव ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बारमाही
सिंचनासाठी 2 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या भागपूर उपसा सिंचन योजनेतून 55 हजार
हेक्टर क्षेत्र सिंचन खाली येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 93
गावातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा
राज्याचे महसूल, मदत, पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकात पाटील
यांनी केले.
जामनेर
तालुक्यातील पहूर येथे 2 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या भागपूर उपसासिंचन
योजनेच्या टप्पा 2 अंतर्गत कामाचे भूमिपुजन व फलक अनावरण पालकमंत्री ना. चंद्रकांत
पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी
ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा उज्वला पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय
सावकारे, आ. हरिभाऊ जावळे, उन्मेष पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री एम. के.
पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, प्रांताधिकारी
दिपमाला चौरे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पहूरच्या सरपंच निता
पाटील, व्ही. डी. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मागदर्शन करतांना म्हणाले की, 2 हजार 300 कोटी
रुपयांच्या भागपूर उपसा सिंचन प्रकल्पातून जिल्ह्यात 55 हजार हेक्टर क्षेत्र
सिंचनाखाली येणार असून यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दरवर्षी 660
कोटी रुपयांची वाढ होणार आहे. गेल्या साडे चार वर्षात राज्यातील अपूर्ण सिंचन
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून
राज्यात 8 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन
यांना यश आले असून त्यांचे पालकमंत्र्यांनी जाहिर विशेष अभिनंदन केले. ते पुढे
म्हणाले की, जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद देणारा दिवस असून
शासन गरीब, कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. येणाऱ्या 2022 पर्यन्त
राज्यातील प्रत्येक बेघर कुटुंबाला मोफत घर, वीज, गॅस कनेक्शन, रस्ते, पिण्याचे
पाणी देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, भागपूर उपसासिंचन योजना जामनेर,
पाचोरा व जळगांव ग्रामीण या तीन तालुक्यांना वरदान ठरणार असून या योजनेतून 60
टीएमसी पाणी साठा उपलब्ध होणार आहे. यामुळे या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना
बारमाही सिंचनाची व्यवस्था होणार असून यामुळे शेतकरी आपल्या विकास साध्य करेल,
असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. महाजन पुढे म्हणाले की, या योजनेसाठी
तातडीने 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच नाबार्डकडून 15 हजार कोटी
रुपयांचे कर्ज घेणार असून यातून भागपूर उपसासिंचन योजना व तापी निम्न प्रकल्पासाठी
तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, 40
कोटी रुपये खर्च करुन वाघूर धरणातून पहुरसह परिसरातरील 40 गांवाना कायमस्वरुपी
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच
या उपसासिंचन योजनेमुळे भागपूर धरणासह गांगडीनाला, मार्गस्थ जलाशय व वितरण कुड,
फर्दापूर तांडा वितरण कंड या जलाशयात पाणीसाठा राहणार असून तिनही तालुक्यातील 93
गावांना लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सहकार
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, जामनेर, पाचोरा व जळगांव तालुक्यातील
वंचीत गावांना या उपसासिंचन योजनेचा लाभ होणार आहे. जलसंपदा मंत्र्यांनी निम्न
तापी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी केली.
प्रारंभी
पालकमंत्री चंद्रकात पाटील, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जागतिक
महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, रुपाली पाटील, निता
पाटील, ज्योतीबाई धोंगडे, विजया खडसे, रंजना चव्हाण, कोमल महाजन यांचा सन्मान
करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक
संजय कुलकर्णी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत अधिक्षक अभियंता आ. श्री. मोरे
यांनी केले. सूत्रसंचलन अपूर्वा वाणी यांनी केले तर आभार अरविंद देशमुख यांनी
मानले.
000
No comments:
Post a Comment