Saturday, 29 December 2018

शहरात बालमहोत्सवास सुरूवात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन


           


         जळगाव,दि.29 :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे वतीने बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व इतर मुले यांचेसाठी बालमहोत्सव दि. 29 डिसेंबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे होत आहे.
            त्यात या मुलांसाठी विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम इ. घेण्यात येणार आहेत.

            या महोत्सवाचा उदघाटन समारंभ दि. 29 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता  जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे  संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अधिष्ठता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अध्यक्ष डॉ. भास्कर  खैरे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण समिती सदस्य,  डॉ. शैलजा चव्हाण, ॲङ प्रदिप पाटील, श्री. नितीन विसपुते हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी क्रिडा क्षेत्रातील तज्ञ शिक्षक श्री. प्रविण पाटील, श्री. इकबाल मिर्झा, श्री. आसिफ मिर्झा, साजीद खान, जाहिद खान हे पंच म्हणून उपस्थित होते.
             मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दिपप्रज्वलन करुन बाल महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी कार्यालयातील श्री. गजानन देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी, श्रीमती. संध्या वानखेडे, विधी सल्लागार, परिवीक्षा अधिकारी श्रीमती जयश्री पाटील, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, शाळेचे शिक्षक, महिला व बाल विकास क्षेत्रातील संस्थांचे अधिक्षक, अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
            सदर बाल महोत्सवात विभागाच्या संस्थांमधील बालके तसेच इतर शाळांमधील बालके असे एकूण 700 बालके सहभागी होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रमेश काटकर यांनी केले. तसेच अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव डॉ. भास्कर खैरे व श्री. नितीन विसपुते यांनी कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री. एस.आर. पाटील जिल्हा परिवीक्षा अधिकारी, जळगाव यांनी केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिवीक्षा अधिकारी श्रीमती सारिका मेतकर यांनी केले. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000

जिल्ह्यातील चारा शेजारच्या जिल्हा अथवा राज्यात वाहतुकीवर निर्बंध आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर


        जळगाव,दि.29 :- जळगाव जिल्ह्यात भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असणे आवश्यक आहे. भविष्यात उत्पन्न होणाऱ्या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चारा शेजारच्या जिल्हा अथवा राज्यात वाहतूक करण्यास यापूर्वीच  निर्बंध घालण्यात आले आहे.
           तथापी सदर आदेशाचा कालावधी हा 60 दिवसापावेतो असलेने पुढील कालावधीसाठी आदेश पारीत करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर जळगाव हे जिल्ह्यातील चारा, लगतच्या जिल्ह्यांत किंवा लगतच्या राज्यात वाहतुक करण्यास निर्बध घालत आहे.
       आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती विरुद्ध, संस्थे विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यांत येईल.
         सदरचा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार सबंधितावर नोटीस बजविणेसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्याने टंचाईच्या परिस्थितीत एकतर्फी काढण्यात येत आहे. हा आदेश, आदेशाच्या दिनांकपासून 60 दिवसाच्या कालावधीसाठी लागू राहील. असे जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                         000

Friday, 28 December 2018

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आज प्रशिक्षण


        जळगाव,दि.:- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकूण  ४६० गावांची निवड करणेत आली आहे. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात निवड करणेत आलेल्या २२९ गावांशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचेकरीता जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रकल्पाची तोंडओळख व रुपरेषा प्रशिक्षण (Orientation) दि. २९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी  ११ ते ५ या वेळेत छत्रपती संभाजी राजे नाटयमंदिर, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. असे प्रकल्प विशेषज्ञ कृषी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 
000

Thursday, 27 December 2018

संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा साधनसामुग्रीचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजनासाठी अभियान- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांची माहिती


            जळगाव,दि.२७:-  या वर्षातील संभाव्य चारा टंचाई विचारात घेता, पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील पशुधन जगविण्याचा विचार करणेसाठी सकारात्मक उद्देशाने राज्यभरात सद्यस्थितीत उपलब्ध हिरवा चारा, पिके व वाळलेला चारा ह्या साधनसामुग्रीचे सुयोग्य शास्त्रोक्त पध्दतीने  नियोजन करण्यात येत आहे.

            दि. १ ते १० जानेवारी, २०१९ या कालावधित चारा साक्षरता अभियान राबविण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले. त्यानुसार  प्रत्येक तालुक्यात कामधेनू योजनेच्या धर्तीवर (३०० प्रजननक्षम गाई / म्हशी) दोन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन अगदी  सोप्या पध्दतीने करावयाचे  आहे.
            या अभियानात गावातील पंचायत सभागृह, समाज मंदीर, चावडी, जिल्हा परिषद शाळेचे पटांगण, दुध संकलन केंद्र किंवा तत्सम ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
            या अभियानात पशुपालक व शेतकरी बांधवाना उपलब्ध हिरवा, वाळलेल्या चा-याचे सुयोग्य नियोजन, बचत तसेच व्यवस्थापन, चाऱ्यापासून मूरघास तयार करणे व टिकवणे चा-याची सकसता व पाकता वाढविणे, अझोला व हायड्रोफोनीक्स, तंत्रज्ञानाबाबत प्रात्यक्षिक व ध्वनीफित दाखविणे, यात स्वयंस्फुर्तीने लोक प्रतिनिधींना सहभागी व्हावे.  असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यातआले आहे.
            चारा उत्पादन, साठवणूक व प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती कृषि अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांचेमार्फत देण्यात येणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न



             जळगाव:दि.27:- जिल्हा दक्षता समितीची सभा आज अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयातील   सभागृहात पार पडली.
           सदर बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गोविद शिंदे, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, भडगाव पंचायत समिती सदस्या डॉ. अर्चना पाटील, महेंद्र बोरसे, सुनिल जावळे आदि उपस्थित होते.
            अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर  यांनी  सर्व संबंधित  विभागांच्या अधिकाऱ्यांकडून  मागील सभेत दाखल तक्रारींवर चर्चा करून  विषयनिहाय आढावा घेतला. यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रतिनिधींकडून धान्य वितरण प्रणालींमध्ये येणाऱ्या तांत्रीक अडचणींच्या सूचना आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होवून रुट नॉमिनीसाठी मार्ग काढणे, वृद्ध व्यक्तींच्या बोटांच्या ठसांच्या अडचणी, अन्न सुरक्षा कायद्यान्वये पात्र लाभार्थ्यांच्या अडचणींबाबत व्यक्त केलेल्या सूचनांवर चर्चा होवून अडचणी सोडविण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात येईल. असे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी  शेवटी सांगितले.
०००००