Saturday, 15 December 2018

कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेवू नये


          जळगाव दि. 15:- कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून भारतातील कापूस पिकाखालील क्षेत्राचा विचार करावयाचा झाल्यास त्यात महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रम लागतो.
            राज्यात सरासरी 41.91 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. खरीप 2018 मध्ये 42.53 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे असून त्यामध्ये बहुतांशी बीटी वाणांचा समावेश आहे.
            या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान संभवते.
            शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असून कापूस उत्पादनाशी निगडीत सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादक कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे (मार्केटयार्ड), गोडाऊन, जिनिंग/प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांची भुमिका अत्यंत महत्वाची असल्याने शेतकरी
बांधवांना अवाहन :-
            कापूस पिकाची फरदड/खोडवा घेऊ नका: कापूस पिकाची फरदड घेतल्यास किंवा कापूस पिकाचा हंगाम वाढविल्यास शेंदरी बोंड अळीसाठी नियमित खाद्य उपलब्ध होऊन किडीचे जीवनचक्र सतत पुढे चालू राहते. फरदडीपासून थोडेफार उत्पादन मिळत असले तरी या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या श्रेडर/रोटाव्हेटर यासारख्या यंत्रांद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत होण्यास मदत होईल.
            यावर्षी कृषि यांत्रिकीकरण योजनेतून श्रेडर्सची अनुदानावर उपलब्धता करुन देण्यात येत आहे.त्याकरीता नजीकच्या कृषि अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. 5 ते 6 महिने कापूस विरहित शेत ठेवल्यास शेंदरी बोंड अळीचे जीवनचक्र संपुष्ठात येते त्यामुळे पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
            कपाशीचा हंगाम संपण्याच्या शेवटी शेतातील कीड-रोगग्रस्त पाने, पाते, फुले, बोंडांमध्ये असलेल्या बोंड अळीच्या विविध अवस्था नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत.
            कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करुन बांधावर ठेवू नये. कपाशीच्या पराट्या, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे.
            पऱ्हाट्या शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या कांडी कोळसा/ इंधन ब्रिकेट्स (Fuel Briquettes) तयार करणाऱ्या कारखान्यांना द्याव्यात.
            पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट हिवाळयातच करावी त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील.शक्यतो दिवसा नांगरट केल्यास किडीचे नैसर्गिक शत्रु चिमण्या, कावळे, बगळे याद्वारे नियंत्रण होते.
            सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी कपाशीनंतर चारा पिकाची फेरपालट करावी त्यामुळे कापूस पिकाच्या उपलब्धते अभावी शेंदरी बोंडअळीच्या पुढील पिढ्या मर्यादित राहतील. कारण ही कीड केवळ कापूस पिकावरच उपजिविका करते.
            सध्या वेचणी केलेला कापूस मार्केटयार्ड, जिनिंग-प्रेसिंग मिलमध्ये येत आहे. त्या ठिकाणीही शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाची कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कापूस खरेदी केंद्रे (मार्केटयार्ड), गोडाऊन, जिनिंग/प्रेसिंग मिल्स या संस्थांना अवाहन करण्यात येते की, त्यांनी सदर परीसरात कापसापासून निर्माण झालेला कचरा, सरकीतील आळ्या व कोष नष्ट करावेत. तसेच, त्या ठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावून त्यात अडकलेले पतंग नियमित गोळा करुन नष्ट करावेत.
            शेतकरीस्तरावर साठवणूकीच्या ठिकाणी फेरोमन सापळे व प्रकाश सापळयांचा वापर करण्यात यावा.
            खरीप 2019 हंगामापूर्वी शेतकरी त्याचबरोबर सर्व संबंधीत यंत्रणांनी संयुक्तपणे मोहिम स्वरुपात तातडीने उपाय योजना केल्यास शेंदरी बोडअळीचे निर्मुलन करणे शक्य होईल.
00000

No comments:

Post a Comment