Saturday, 8 December 2018

बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादीत मालासाठी व्यासपीठ उपलब्ध : पंकजा मुंडे






* बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल
* आशा वर्करचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु

           जळगाव दि. 8, बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या माल विक्रीसाठी व्यासपीठ मिळाले असून याचा जास्तीत जास्त फायदा महिलांनी करुन घ्यावा असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज केले. गुरुनाथ फाऊंडेशन, मुक्ताईनगर यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे 4 दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

            यावेळी व्यासपीठावर पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आ. एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. पी पाटील , आ. हरिभाऊ जावळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. राजू भोळे, आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, महोत्सव प्रमुख डॉ. सुनिल नेवे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पं. स. सभापती प्रिती पाटील उपस्थित होते.

            पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, बहिणाबाई महोत्सवातून बचत गटातील महिलांना प्रेरणा मिळणार असून महिलांनी जीवनात रडत न बसता लढण्यास शिकावे, बहिणाबाईंनी कठीण परिस्थितीचा सामना करुन खान्देशातील महिलांना कवितांच्या माध्यमातून लढण्यास बळ निर्माण करुन दिले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            त्यापुढे म्हणाल्या की, बहिणाबाईंच्या नावातच संस्कृती ओतपोत भरली असून त्यांनी रचलेल्या कविता 21 व्या शतकातही प्रभावी ठरत आहे. बहिणाबाईंवर अनेक संकट आले परंतू त्यांनी संकटांचा सामना केला आहे.

            ना.पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, बचत गटांना 100 टक्के
  कर्ज शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाणार असून बचतगटांतील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ना. पंकजा मुंडे यांनी बहिणाबाईंच्या कवितांचे संदर्भ देवून महिलांनी जीवनात कितीही संकट आले तर त्याचा सामना करण्याची ताकद महिलांमध्ये निर्माण करण्याची किमया बहिणाबाईंच्या कवितेत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
            यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, बचत गटाच्या महिला चांगल्या प्रतीचा माल उत्पादीत करतात, परंतू त्यांना मार्केटींग जमत नसल्यामुळे त्यांच्या मालाला पाहिजे तशी किंमत मिळत नाही. परंतू बहिणाबाई सारखे महोत्सवाच्या आयोजनामुळे त्यांना माल विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

            ना. जयकुमार रावळ पुढे म्हणाले की, यापुढे बहिणाबाई महोत्सवाला पर्यटन विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जाणार असून पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात चालना दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

            जयकुमार रावळ यावेळी म्हणाले की, कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे आसोदे या गावातील त्यांचे घर संस्कृती दालन पर्यटन विकासाच्या माध्यमातून
  विकसित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील
  महिला व विद्यार्थ्यांना खासदार रक्षा खडसे यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून नविन व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून या महोत्सवातून नवनविन उपक्रम राबविले जात आहेत. यातून महिला बचत गटानांही प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन दरवर्षी वेगवेगळ्या तालुक्यात करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे आग्रह धरला, व चांगले काम करणार्‍यांना या महोत्सवातून प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, खासदार रक्षा खडसे चार वर्षापासून बहिणाबाई महोत्सव साजरा करत असून या कार्यक्रमातून बचत गटांच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. महिला बचत गटांना केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे.

            आ. एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, मागच्या वर्षी बहिणाबाई महोत्सवात बचत गटांची 70 लाखांची विक्री झाली होती. यावेळी किमान 1 कोटी रुपयांची विक्री झाली पाहीजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            प्रारंभी पंकजा मुंडे यांच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या महिलांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यात प्रा. कमल पाटील, मिनाश्री निकम, शोभा हंडोरे, सायुरी महाजन, यामिनी लोहार, शैला वाघुळदे, शोभा पाटील या महिलांचा यावेळी सन्मान केला गेला.
यावेळी पंकजा मुंडे व उपस्थितांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या सचित्र पोस्टर, प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करुन पहाणी केली. बहिणाबाई यांच्या प्रतिकुटीची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल रुख्मीणी यांचेही दर्शन श्रीमती मुंडे यांनी घेतले.
 
            या महोत्सवात 350 बचत गट सहभागी झालेली आहेत, या चार दिवशीय महोत्सवात सांस्कृतीक, कला, साहित्य अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            कार्यक्रमाचे प्रस्ताविक खा. रक्षा खडसे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. जतीन मेढे, प्रा. सुनिल नेवे, प्राचार्य कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मानले

000

No comments:

Post a Comment