Monday, 3 December 2018

दिव्यांग व्यक्तींनी शारिरीक व्यंगाला हटवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचा निश्चय करावा - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर






     जळगाव, दि. 3 - भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहिर केले आहे. निवडणूक कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना अति विशेष व्यक्तीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी आपल्यातील शारिरीक व्यंगाला हटवून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा निश्चय करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
     जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हा निवडणूक अधिकारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार दिवस साजरा करणे व दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
     यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील, तहसीलदार अमोल निकम, भडगावचे नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, चाळीसगाव येथील स्वयंदीप स्वयंसेवी संस्थेच्या अधक्षा श्रीमती मिनाक्षी निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, प्रसन्नकुमार रेदासनी, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यात 26 हजार पेक्षा अधिक दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. या मतदारांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे. दिव्यांगांना मतदान करताना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये. यासाठी त्यांना ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा करण्यात येत आहे. तसेच आवश्यक त्या सोयीसुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्याही दिव्यांग व्यक्तीला कोणत्याही साहित्याची आवश्यकता भासली तर त्यांना जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्रामार्फत साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल. दिव्यांग व्यक्तींनी जीवनात पुढे चालत रहा, मार्ग सापडेल आणि निश्चितपणे यश मिळेल असा मंत्र ही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिला.
     नायब तहसीलदार मुकेश हिवाळे म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात दिव्यांगत्व बोचत असते. परंतु दिव्यांगानी त्यावर मात केली पाहिजे. मला जे काही करायचे आहे ते मी करणारच हा ध्यास घेतल्यास यश नक्की मिळेल. श्रीमती मिनाक्षी निकम म्हणाल्या की, जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर हे दिव्यांगाचा अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच संवेदनशील असतात. त्यामुळे दिव्यांगाच्या अडचणी लवकर दूर होत आहे. आयोगाने आपल्याला अति विशेष व्यक्तीचा दर्जा दिलेला असल्यामुळे आपलीही जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी गनी मेमन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. हेलन किलर यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुकुंद गोसावी यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना शारिरीक व्यंगाला हटवू, चला मतदान करु असे सांगून आयोगाने दिव्यांगांना अति विशेष व्यक्तींचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले.
       चाळीसगाव येथील संगीत शिक्षक अभय कसबे यांनी स्वागतगीत म्हटले. सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास कर्णबधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग मतदार दिनानिमित्त प्रबोधनात्मक नाटीका सादर केली. तर दिपस्तंभ संचलित मनोबल ची विद्यार्थीनी आशा हिने ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत सादर केले.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगाव संचलित जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राच्यावतीने दिव्यांगांना  सायकल व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
     कार्यक्रमास शेख अल्ताफ, गणेश पाटील, भरत चौधरी यांच्यासह दिपस्तंभ, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, निवडणूक शाखा, समाजकल्याण विभाग व विविध संस्थाचे विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
     उपस्थितांचे आभार सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील यांनी मानले.
                                                                              000

No comments:

Post a Comment