Saturday, 7 July 2018

खरीप हंगाम 2018-19 सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन


        जळगाव, दि. 7:- सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक असून केंद्र शासनाच्या सूचनांनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण 35 टक्के पर्यंत असणे आवश्यक आहे. सरळ वाणांचे प्रत्येक वर्षी नवीन बियाणे घेतल्यामुळे शेतक-यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. पर्यायाने त्याला आर्थिक लाभ कमी होतो. सोयाबीनमध्ये सर्वच वाण हे सरळ वाण आहेत. त्यामुळे अशा वाणांचे बियाणे प्रत्येक वर्षी बदलणे आवश्यक नसते. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 ते 3 वर्षापर्यंत वापरता येते. सोयाबीन बियाणाचे उपलब्धतेकरीता पूर्व नियोजन करणेसाठी शेतक-यांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
          सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 वर्षात वापरता येते. शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतक-यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले स्वत:कडील सोयाबीन बियाणे चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत  शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते. शेतक-यांनी प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करुन चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाहय आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राहण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणूकीसाठी प्लॅस्टीक पोत्यांचा वापर करु नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही शेतक-यांनी याची काळजी घ्यावी. पेरणीसाठी बियाणे साठवून ठेवतांना बियाणे पिशव्यांची जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही. त्याची कमीत कमी हाताळणी होईल याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन पध्दतीने किंवा प्लॅटरचा वापर करुन पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता चाचणी फार गरजेची असते. त्यावरुन चांगल्या उगवणक्षमतेची खात्री  पटू शकते. पेरणी करतेवेळी बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे. याबद्दल अदांजही येऊ शकतो. हि पध्दत सोपी असल्यामुळे घरच्या घरी ही चाचणी करता येते. यासाठी शेतक-यांनी स्वत:कडे असलेले बियाणेची चाळणी करुन त्यामधील काडीकचरा, खडे, लहान/ खुरटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणी नंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घडया पाडाव्यात यामुळे कागदाची जाडी वाढेल नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी 10 बियाणे घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या  भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशारितीने 100 बियांच्या 10 गुंडाळया तयार कराव्यात. नंतर या गुंडाळया पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात चार दिवसानंतर त्या हूळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात जर ती संख्या 50 असेल तर उगवणक्षमात 50 टक्के आहे, असे समजले जाते. जर ती संख्या 80 असेल तर उगवणक्षमात 80  टक्के आहे असे समजले जाते. अशा पध्दतीने उगवणक्षमात अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाणेची उगवणक्षमता चांगली म्हणजेच 70 ते 75 टक्के असेल अशी शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टर 75 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवणक्षमता कमी असेल तर त्याच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपुर्वी 3 तास अगोदर बीज प्रक्रिया करुन असे बियाणे सावलीत वाळवावे व पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, बियाण्याची पेरणी 2.5 ते 3 से.मी खोलीवर करावी असे आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य पुणे -1 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment