जळगाव दि. 11 - राज्यात
सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या
अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा
शेतीशाळा हा आत्मा असल्याचे प्रतिपादन प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी
यांनी केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची आढावा
बैठक श्री. रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन भवनात पार पडली. यावेळी
मंचावर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले,
कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक वाकुरे, कार्यक्रम समन्वय हेमंत
बाहेती, नाबार्डचे श्री. जांभोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री. रस्तोगी पुढे म्हणाले की, नानाजी
देशमुख कृषि संजीवनी हा प्रकल्प राज्यात 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. हा
प्रकल्प तयार करतांना राज्यातील तिन्ही कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र
यांच्याशी चर्चा करुन विभागनिहाय कोणते प्रयोग यशस्वी झाले व कोणते यशस्वी होवू
शकतात. भौगोलिक परिस्थिती, हवामान, सामाजिक रचना इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करुन
तयार केलेला आहे. जिल्हास्तरीय यंत्रणांना योग्य दिशा देवून प्रकल्प यशस्वी
करण्यासाठी कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांना या प्रकल्पाच्या माध्यमातून
मोठी संधी उपलब्ध आहे. आपले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांची यशस्वीता
तपासता येणार आहे. शेतकरी नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास तयार आहे. नवीन तंत्रज्ञान
स्वीकारतांना त्यातील जोखीम कमी करण्यासाठी काही ठराविक क्षेत्रावरच ते प्रयोग करु
इच्छीतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित शेतीशाळेतून त्यांचे प्रभावी प्रबोधन
होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे
अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर मार्गदर्शन करतांना म्हणाले, कृषी संजीवनी प्रकल्पात
‘एरिया ट्रीटमेंट’ महत्वाचे असून माथा ते पायथा ही संकल्पना येथेही लागू असल्याने
तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी आपआपसात उत्तम समन्वय ठेवावा. सर्व संबंधित
यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत काम पूर्ण करुन जिल्हा राज्यात
अग्रभागी राहील असे प्रयत्न करावे.
प्रारंभी प्रकल्प विशेषज्ञ संजय पवार
यांनी प्रस्ताविकात जिल्ह्यातील 15 तालुक्यातून 460 गावांची निवड या प्रकल्पासाठी
झालेली असून पहिल्या टप्पयात 124 गावे असून 92 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये 84
ग्राम संजीवनी समित्या स्थापन झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुक्ताईनगरचे तालुका कृषी
अधिकारी श्री. बाळासाहेब व्यवहारे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील समग्र प्रकल्प
आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले. शेतीशाळेबाबत हेमंत बाहेती, सुक्ष्म नियोजन
प्रक्रियेबाबत श्री. श्यामकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या
हस्ते घडीपत्रिका प्रकाशन व प्रशिक्षकांना किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास
कृषी विभागतील अधिकारी, कृषी सेवक तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी
उपसंचालक श्री. अनिल भोकरे यांनी आभार प्रदर्शन केले.
000
No comments:
Post a Comment