![]() |
जळगाव, दि. 9 - राज्य शासनाचा
महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात मोठया
प्रमाणात सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर
राजे निंबाळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत.
जिल्ह्यात सुरु असलेल्या जलयुक्त
शिवारच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. निंबाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली साप्ताहिक आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या
बैठकीस जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक
संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर,
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, लघुसिंचन (जलसंधारण) चे कार्यकारी
अभियंता राजेंद्र नंदनवार, लघुसिंचन (जिल्हा परिषद) चे कार्यकारी अभियंता श्री. नाईक,
कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांचेसह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले
की, जिल्ह्यात जलयुक्तची कामे मोठया प्रमाणात सुरु आहे. ज्या भागात अद्याप पावसाचे
प्रमाण कमी आहे त्या भागातील प्रगतीत असलेली कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असून
त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर जी कामे पूर्ण झाली
आहे. त्यांचे जिओ टॅगिंग वेळेत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. जिल्ह्यात
सन 2017-18 मध्ये 4093 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 3692 कामे पूर्ण झाली आहे.
तर 401 कामे प्रगतीत आहे. प्रगतीत असलेली
कामे लवकरात लवकर पूर्ण करा. जेणेकरुन या कामांमुळे पावसाचे पाणी अडविले जाईल. यावेळी
सन 2016-17 मधील कामांचा आढावा घेण्यात आला तर 2018-19 मध्ये करण्यात येणाऱ्या
कामांच्या नियोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांकडून जाणून
घेतली. जिल्ह्यास 2 हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यापैकी
जिल्ह्यात आतापर्यंत 1886 शेततळे पूर्ण झाली आहे. उर्वरित शेततळ्यांची कामे लवकर
मार्गी लावण्याच्या सुचनाही याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
000
No comments:
Post a Comment