Sunday, 8 July 2018

वृक्ष लागवड ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी ---- पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील





जळगाव दि.8 (जिमाका वृत्तसेवा) : वृक्षांचा संबंध  पर्यावरण व पर्जन्यमानाशी असून दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी  वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन व संगोपन करणे ही समाजातील सर्व घटकांची सामाजिक जबाबदारी आहे,असे प्रतिपादन राज्याचे  महसूलमंत्री तथा जळगाव जिल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आव्हाणे येथे केले.
          सामाजिक वनीकरण विभागामार्फत आव्हाणे गावांलगत रस्त्यांच्या कडेला एक हजार  रोपांच्या लागवडीचा  शुभारंभ पालकमंत्री श्री.पाटील यांच्या  हस्ते आज आयाजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी  व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर ,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती  प्रभाकर सोनवणे,जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक  दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उप वन संरक्षक संजय दहिवले, सामाजिक वनिकरण विभागीय वन अधिकारी बी.एस.पाटील ,जळगाव  पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शकुंतला सोनवणे,आव्हाण्याच्या सरपंच श्रीमती.वत्सलाताई मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे रोपे देवून स्वागत करण्यात आले.
        पालकमंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले की, राज्य शासनाने 50 कोटी वृक्ष लागवडीसाठी एक कालबद्ध  कार्यक्रम तयार केला आहे.  यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करावयाची असून त्यासाठी 1 ते 31 जुलै असा कालावधी निर्धारित केला आहे .समाजात वृक्ष लागवडी विषयी जागरूकता निर्माण झालेली असून ही मोहीम लोकचळवळ झालेली आहे. या माहिमेत समाजाचा  सहभाग मोठया प्रमाणात मिळत आहे.
           मुलगी जन्मास आलेल्या कुटुंबियांना वृक्षारोपणासाठी   वन विभागातर्फे मोफत रोपांचा पुरवठा केला जात आहे. 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत आतापर्यंत  लागवड केलेल्या  रोपांपैकी 85 टक्के रोपे जिवंत आहेत. हे चांगले प्रमाण असून ते वाढविण्यासाठी समाजाचा सक्रीय पाठिंबा आवश्यक आहे.  आकाराने मोठया  रोपांची लागवड करावी जेणे करून ती जगतील तसेच त्यांची  वाढही लवकर होईल .
           जिल्हाधिकारी  श्री. निंबाळकर यांनी 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जिल्हयास दिलेले 43लाख वृक्ष लागवडीच्या  उद्ष्टिापेक्षा जास्त लागवडीचे नियोजन केले असून जिल्हयात 45 लाख वृक्षांची लागवड केली जाईल.यात सर्व विभागांचे सहकार्य असून शिक्षण संस्था,सामाजिक संस्था मोठया प्रमाणावर सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगीततले. जळगाव वन विभागाचे  उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी प्रास्ताविक केले. तर सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.                                   
                             आव्हाणे फर्स्ट संस्थेतर्फे वृक्षारोपण
       आव्हाणे फर्स्ट या संस्थेतर्फे 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत आव्हाणे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पालकमंत्री  श्री.  पाटील  यांच्या हस्ते वृक्षारोपण   करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिवेकर, समाज कल्याण सभापती  सोनवणे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बी.ए.बोटे ,गटविकास अधिकारी श्रीमती. सोनवणे, गट शिक्षणाधिकारी  कल्पना चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती.प्रतिमा सानप यांच्यासह ग्रामस्थ ,शालेय विद्यार्थी ,आव्हाणे फर्स्टचे सदस्य उपस्थित  होते.
           उपस्थितांना मार्गदर्शन करतांना  पालकमंत्री  श्री.पाटील म्हणाले  परसबागेत औषधी फळझाडे लावून आपल्या  उत्पनाचे मार्ग निर्माण केले पाहिजेत . रोपांच्या वाढीसाठी ठिबक सिंचनाचा उपयोग  करावा.जेणेकरून  पाण्याचीही बचत होईल. ज्या  परिसरात जंगलांचे प्रमाण अधिक आहे  तेथे पाऊस जास्त पडतो .आपल्या भागातील  दुष्काळाचे सावट दुर करण्यासाठी वृक्षारोपणशिवाय  पर्याय  नाही, असेही ते म्हणाले. प्रारंभी सरपंच श्रीमती. वत्सलाबाई मोरे यांनी रोपे देवून मान्यवरांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment