Wednesday, 18 July 2018

निवडणूक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात पार पाडा- राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया


         













         जळगाव,दि.18-  निवडणूक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले जाणार नाही यासाठी सबंधित यंत्रणांनी निवडणूक कालावधीत आपले कर्तव्य नि:पक्षपातीपणे पार पाडावे अशा सुचना राज्याचे  निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज दिल्या,
               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  नियोजन सभागृहात आज राज्य  निवडणुक आयुक्त ज.स. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 आढावा बैठक घेण्यात आली यावेळी  ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य निवडणूक निरीक्षक प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे व्यासपीठावर उपस्थित होते.
         मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यावेळी निवडणूकीसंबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, निवडणूकीसाठी निवडणूक आयोग व महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मतदार नोंदणी अभियानाद्वारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होवून लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढेल यासाठी सबंधित यंत्रणांनी  पथनाटय,  होर्डिंग्ज, दूरदर्शन, आकाशवाणी, एल.ई.डी. व्हॅन या माध्यमातून मतदारांमध्ये  मोठ्या प्रमाणात जनजागृती  व्हावी यासाठी  प्रयत्न करावेत .
          ते पुढे म्हणाले की, निवडणूक कालावधीत जागृत नागरीकांनी कुठे गैर प्रकार होत असल्याचे आढळून आले  तर त्यांनी ताबडतोब पोलिस यंत्रणा किंवा आचार संहिता भंगाच्या तक्रारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मोबाईल ॲपवर तातडीने  कळवावे. अशी माहिती देणाऱ्या  जागृत नागरिकाचे नाव मोबाईल क्रमांक हा गोपनीय ठेवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सहारिया पुढे म्हणाले की, निवडणूकीच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने इन्कम टॅक्स व सेल टॅक्स अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून उमेदवाराने खर्चाची मर्यादा ओलांडून खर्च केला असेल व  दैनंदिन खर्च  कमी दाखविला तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार  कडक कायदेशीर कारवाई करावी असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
                 सहारिया पुढे म्हणाले की, निवडणूक कालावधीत सोशल मिडीयावर  काही लोक चुकीचा मजकूर  टाकून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन अफवा पसरवतात अशा लोकांवर कार्यवाही करण्यासाठी  जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी तातडीने उपाय योजना कराव्यात. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याकडे पोलीस विभागाने लक्ष ठेवावे निवडणूक कालावधीत बॅंकांतून मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होत असल्यास बॅक अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस विभागास कळवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
              ते पुढे म्हणाले की, भरारी पथकांनी व उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक कालावधीत अवैध दारुचा साठा शहरात येणार नाही यासाठी चेक पोस्टावर तपासणी पथके नेमून नियमीत तपासणी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा महानगरपालीका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी निवडणूक पूर्व तयारीची माहिती देतांना सांगितले की, शहरात एकूण 3 लाख, 65 हजार 72 मतदार असून त्यांत पुरुष 1 लाख 93 हजार 372 तर स्त्रीया मतदार 1 लाख 71 हजार 617 आहेत. एकूण मतदान केंद्र 469, असून यात 146 मतदान केंद्रे ही संवेदनशिल असून अशा केंद्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मतदार केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी 2887 असून पोलिस बंदोबस्तात 2 हजार 394 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचा भंग होवू नये यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून एस.एस.टी. 6 पथके, व्ही.एस.टी.  6 पथके, भरारी 3 पथके व्ही.व्ही. टी. 3 पथके, रेल्वे भरारी पथक 1, आयकर अधिकार पथके  3 नियुक्त करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले
              निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की, पोलिस विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या असून पोलीस विभागाचे भरारी पथके रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ व बॅकेतून होणाऱ्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवून असून जिल्हाधिकाऱ्यांच्या व मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था आढावा बैठका घेण्यात आली असून पोलीस विभाग निवडणूकीसाठी सज्ज झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
                प्रारंभी नियोजन सभागृहात राज्य निवडणूक आयुक्त व उपस्थित अधिकाऱ्यांसमोर दिशा बहुउद्देशीय संस्थांचे विनोद ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  तसेच हायटेक कंपनी नाशिकचे अश्पाक कादरी यांच्या सहकाऱ्यांनी  मतदारांमध्ये जनजागृती व मतदारांनी प्रलोभनाला बळी पडू नये यासाठी पथनाटय्‍ व कव्वाली सादर करुन उपस्थितांची  दाद मिळवली.  
०००

No comments:

Post a Comment