Wednesday, 11 July 2018

टाळ मृदुंगाच्या गजरात वेल्हाळे येथे प्रशासकीय यंत्रणेने केले वृक्षारोपन



    
 जळगाव, दि. 11 - झाडे लावा, झाडे जगवा, एकच लक्ष्य, 13 कोटी वृक्ष या घोषणांनी  व टाळ मृदुंगाच्या गजरात आज सकाळी वेल्हाळे, ता. भुसावळ येथे जिल्ह्यातील विविध विभागांच्या हजारो अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपन केले.
     राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यंदाच्या वर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत 1 ते 30 जुलै दरम्यान जिल्ह्याला 42 लाख 43 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले असले तरी यावर्षी जिल्ह्यात किमान 45 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळर यांनी केले आहे. या संकल्पाच्या पूर्तीसाठी जिल्हाभर जनजागृती करुन मोठया प्रमाणात व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज वेल्हाळे, ता. भुसावळ येथील वनविभागाच्या 10 हेक्टर जागेवर 15 हजार 900 वृक्ष लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
     याप्रसंगी जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी मधुकर चौधरी, सहायक वनसंरक्षक श्री. दसरे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. वराडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, भजनीमंडळी व  ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात आजपर्यंत 17 लाख वृक्षांची लागवड
           13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यात आजपर्यंत 17 लाख 27 हजार 348 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक वनविभागाने 11 लाख 11 हजार 234 वृक्षांची लागवड केली आहे. तर ग्रामपंचायत विभागाने 2 लाख 53 हजार 210, सामाजिक वनीकरण विभाग 2 लाख 50 हजार 124, वन्यजीव 37 हजार 762, जलसंपदा विभाग 20 हजार 230, कृषि विभागाने 19 हजार 661 वृक्षांची लागवड केली असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.
                                                                              000

No comments:

Post a Comment