Sunday, 1 July 2018

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज वृक्ष लागवडीच्या लोकचळवळीसाठी वचनबध्द होण्याचे ना. गिरीश महाजन यांचे आवाहन





जळगाव, दि. 1 - राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेली 50 कोटी वृक्ष लागवड मोहिम ही काळाची गरज असल्याने ही मोहिम लोकचळवळ होण्यासाठी आपण सर्वजण वचनबध्द होऊ या. असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज केले.
          राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यंदाच्यावर्षी विक्रमी 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात यावर्षी 42 लाख 43 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज एकलग्न, ता. धरणगाव येथे राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, पंचायत समिती सदस्य मुकुंद ननावरे आदि उपस्थित होते.
          यावेळी बोलतांना ना. महाजन म्हणाले की, दिवसेंदिवस निसर्गाचा ऱ्हास होत असल्याने निसर्गाचा समतोल बिघडला असून निसर्गाच्या लहरीपणातही वाढ झाली आहे. जंगलतोडीमुळे जंगलाचा नाश होत असल्याने त्याचा परिणाम पाऊस पडण्यावर होत आहे. निसर्गाचा समतोल वेळीच राखला नाही तर आपला भविष्यकाळ अंध:कारमय होईल याची जाणीव ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरीकाने किमान एक तरी झाड लावावे. राज्य शासनाने नागरीकांच्या आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविले, पाण्याच्या प्रत्येक थेंब अडविण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. नागरीकांना या अभियानाचे महत्व पटल्याने हे अभियान आता एक लोकचळवळ झाली आहे. त्याचप्रमाणे वृक्ष लागवड ही सुध्दा एक लोकचळवळ होणे आवश्यक असून यासाठी आपण सर्वजण वचनबध्द होऊ या. यासाठी लहान मुलांमध्ये जनजागृती व्हावी तसेच नागरीक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक असल्याचेही ना. महाजन म्हणाले. 
                                                                                                                                                                                                                                    वृक्ष लागवड हे एक देशकार्यच - ना. गुलाबराव पाटील
          दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा एकप्रकारे देशभक्तीचाच संदेश आहे. या देशकार्यात सर्व नागरीकांनी आपला सहभाग नोंदवून जिल्ह्यात जास्तीत जास्त झाडे लावावीत. राज्य शासनाचा हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम असून हा उपक्रम देशपातळीवर अंमलात आणला जाईल असा आशावाद राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार म्हणाले की,  राज्यात यावर्षी 13 कोटी वृक्ष लावण्यात येणार आहे. यामध्ये 7.5 कोटी वृक्ष वनविभागामार्फत तर 5.5 कोटी वृक्ष इतर विभागांमार्फत लावण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत जळगाव जिल्ह्यास 4 लाख 43 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापूर्तीसाठी 43 लक्ष खड्डे खोदून तयार आहेत. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट़ पुर्तीसाठी वन विभाग 62.33 लक्ष उंच रोपांसह रोपे लागवडीसाठी सज्ज़ असून जिल्ह्यातील जनतेचा वृक्ष लागवडीचा उत्साह पाहता जळगांव जिल्ह्यात 45 लक्ष रोपांची लागवड करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 1150 ग्रामपंचायतींना 12.94 लक्ष रोपे मोफत वाहतुकीसह पुरविण्यात येणार आहेत. तसेच शासकीय यंत्रणा श्रमदानाने 3.18 लक्ष रोपे लागवड करण्यासाठी सज्ज़ झालेली असून जिल्ह्यात लागवड होणाऱ्या 42.43 लक्ष रोपांपैकी एकट्या वनविभागामार्फत सुमारे 65 टक्के म्हणजेच 27.32 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे श्री. पगार यांनी सांगितले.
          यावेळी एकलग्न येथील 25 हेक्टर राखीव वनक्षेत्रावर 39 हजार 750 वृक्ष लागवडीचा शुभारंभ मंत्रीमहोदय व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वनविभागाच्यावतीने मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
          या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जीतेंद्र पाटील, एरंडोलचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील, श्री. दसरे यांचेसह शालेय विद्यार्थी, नागरीक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रतन थोरात यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विभागीय वनअधिकारी बी. आर. पाटील यांनी मानले.
000

No comments:

Post a Comment