Wednesday, 13 September 2017

जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढण्यासाठी 15 सप्टेंबर पासून शिवार फेरीचे आयोजन



               


                 जळगाव, दि: 13 - जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग वाढण्यासाठी या अभियानात निवड झालेल्या गावांमध्ये 15 सप्टेंबर पासून शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीच्या आधारावर गावांचे आराखडे तयार करण्यात येणार असल्याने या गावांतील ग्रामस्थांनी या शिवार फेरीत मोठया संख्येने सामील होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
            जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. या बैठकीस उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, प्रकल्प संचालक आत्मा शिवाजीराव आमले, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, यांचेसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात 206 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावामध्ये जलयुक्तच्या कामांमध्ये लोकांचा सहभाग वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या प्रत्येक गावांतील 5 व्यक्तींना गावाच्या नकाशाचे वाचन तसेच गाव आराखडा कसा तयार करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहायक, महिला प्रतिनिधी यांचा समावेश आहे. निवड झालेल्या गावांमध्ये कामांचा आराखडा तयार करताना गाव हा घटक न धरता पाणलोट हा घटक धरण्यात येणार असून प्रत्येक गावाचा किमान 35 लाख रुपयांपर्यंतच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
            शिवार फेरीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गाव आराखडयास येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मान्यता घेण्यात येणार असून या ग्रामसभेस कृषि विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेने मान्यता दिलेल्या गाव आराखडयास तालुका व जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळाल्यानंतर 15 नोव्हेंबर पासून अथवा पीकांची काढणी झाल्यानंतर लगेचच जिल्हयातील निवड झालेल्या गावामध्ये जलयुक्त शिवारची कामे सुरु करण्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार च्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
            या बैठकीत सन 2016-17 मधील कामांचाही आढावा घेण्यात आला. जिल्हयात 4942 कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 4801 कामे सुरु असून 4277 कामे पूर्ण झाली आहे तर 524 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांसाठी 158.55 कोटी रुपये मंजूर असून 155.79 कोटी रुपयांच्या कामाचे आदेश देण्यात आले आहे तर 74.58 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाल्याची माहिती कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. पीकांची काढणी झाल्याबरोबर उर्वरित कामे तातडीने सुरु करुन पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.
000

No comments:

Post a Comment