Friday, 15 September 2017

कर्जदार शेतकरी सभासदांनी त्यांचे खाते क्रमांक आधार कार्डशी जोडणी करावे -जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



            जळगाव दि. १५ :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अन्वये कर्ज माफी योजनेच्या कामकाज विहित वेळेत पुर्ण करण्यासाठी  कर्जदार शेतकरी सभासदांनी त्यांचे बँक खाते क्रमांक आधार कार्डशी जोडणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत केले. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली.
            या बैठकीस समितीचे सदस्य सचिव आणि जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिड डिस्ट्रीक्ट मॅनेजर, एस.बी.आय. बँक प्रतिनिधी व आय.डी.बी.आय. बँक प्रतिनिधी उपस्थित होते.
            ASSK, CSC, महाऑनलाईन यांनी उर्वरीत ऑनलाईन अर्ज तात्काळ भरुन घ्यावेत. बँकांनी / विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी कर्जदार शेतकऱ्यांची माहिती १ ते ६६ नमुन्यामध्ये २० सप्टेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत भरावी. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड अभावी १ ते ६६ नमुन्यामध्ये माहिती भरण्यास अडचण येत असल्यास बँकांनी त्यांचे सभासद शेतकऱ्यांशी संपर्क साधुन तात्काळ आधार नंबर प्राप्त करुन घ्यावेत. १ ते ६६ नमुने माहिती संगणकावर भरणेसाठी संगणक व संगणक चालकांची संख्या अपुरी आहे त्यामुळे सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यांचे अखत्यारीत असलेले संगणक व संगणक चालक हे वि.का.सोसायटी, जिल्हा बँक कर्मचारी, सहाय्यक निबंधक व त्यांचे संबंधित यंत्रणेला उपलब्ध करुन द्यावे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी मधील अडचणी तात्काळ दुर करुन सर्व संबंधित यंत्रणांनी युद्ध पातळीवर कामकाज करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
00000

No comments:

Post a Comment