जळगाव, दि: 13 - राष्ट्रसंरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले आहेत. अशा
जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी जमा करण्यात येत असलेल्या
ध्वजदिन निधी संकलनाचे जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट दिवाळीपूर्वी पूर्ण
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिले.
ध्वजदिन निधी संकलनाचा आढावा
घेण्यासाठी येथील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
झाली. या बैठकीस उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
प्रविंद बिरादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपविभागीय पोलीस अधिकारी
रशीद तडवी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांचेसह विविध विभागांचे
अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रसंरक्षणासाठी ज्यांनी आपले
प्राणार्पण केले आहेत. त्यांच्या कुटूंबियांच्या त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व
प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या आणि राज्यात
वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी धावून येणाऱ्या जवानांच्या
कल्याणकारी योजनांसाठी निधी गोळा करण्यात येतो. यावर्षी जिल्ह्यासाठी 1 कोटी 68
लाख 72 हजार 440 रुपयांचा निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार
प्रत्येक विभागास उद्दिष्ट देण्यात आले आहे. विविध विभागांनी 85 लाख 66 हजार 546
रुपयांचा निधी गोळा करण्यात आला आहे. जिल्हयातील अनेक विभागांनी दिलेले उद्दिष्ट
पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर उर्वरित निधी
दिवाळीपूर्वी जमा करुन ध्वजदिन निधी संकलनात जळगाव जिल्हा आघाडीवर राहील यासाठी
सर्व विभागांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम करुन या राष्ट्रीय कार्यात
योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना केले.
00000
No comments:
Post a Comment