·
पर्यावरण संवर्धनासाठी ध्येयवेड्या चमूचा ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात
वार्तालाप
जळगाव, दि : 4 - अकरा देशात जवळपास साडेतीन लाख कि.मी. चा पायी
प्रवास करत तब्बल साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड करणाऱ्या प्रेरक आणि त्यागी चमूच्या
वार्तालापातून पर्यावरण संवर्धनासाठी निश्चितच मदत होईल. जिल्हा माहिती
कार्यालयाच्या ‘संवाद पर्व’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी
प्रेरणादायी वार्तालापाचा हा कार्यक्रम एक स्तूत्य उपक्रम आहे. पर्यावरण जनजागृती,
वृक्ष लागवड, जलबचत आणि स्वच्छ शहर यासाठी विद्यार्थ्यांना यातून नक्कीच प्रेरणा
मिळेल व ते सक्रीय होतील. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी
लोकसहभाग वाढण्यास निश्चितच मदत होईल. असे कौतुकोद्वार जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालय, एम. जे. कॉलेज,
स्वामी विवेकानंद फाउंडेशन आणि नीर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित ध्येयवेडया चमूचा प्रेरणादायी संवाद हा कार्यक्रम एम. जे. कॉलेज च्या सोहम
सभागृहात संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मंचावर पर्यावरण
संदेश देत जगभर पायी प्रवास करणारे अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप व महेंद्र
प्रताप, शहराचे आमदार सुरेश भोळे, एम. जे. कॉलेजच्या उप प्राचार्य प्राध्यापक
श्रीमती देवयानी बेंडाळे, जिल्हा माहिती अधिकारी, विलास बोडके, जी. एम. फाऊडेशनचे
अरविंद देशमुख, पितांबर भावसार, नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर पुढे
म्हणाले की, शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांची माहिती जनतेला व्हावी, या
योजनांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्यावतीने
‘संवाद पर्व’ या उपक्रम राबविण्यात येत
आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हयात विविध सामाजिक कार्यक्रम हाती घेतले
आहेत. विशेष करून गणेशोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून,
पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड, नेत्रदान, अवयवदान, क्रीडा, कृषि विभागाच्या विविध
योजनांबाबत प्रबोधन करण्यात आले. नागरीकांचा यात उत्स्फूर्तपणे सहभाग लाभत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेऊन
समाजात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी
यावेळी व्यक्त केले.
तरुणांनी फक्त नोकरीसाठी शिक्षण न घेता
कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून स्वतःमधील कौशल्य विकसित करून स्वयंरोजगाराकडे
वळायला हवे. असे सांगत केंद्र व राज्य शासन विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवित आहे या योजनांचा
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. पर्यावरण संवर्धनासाठी ध्येयवेड्या चमूचे कार्य
आदर्शदायी असून यातून स्फुर्ती घेण्याचे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती बनविण्याची
कला शिकून घ्यावी. गणेशमुर्ती शाडू मातीपासून बनविल्यास नक्कीच पर्यावरण पूरक
उत्सव होईल, असे सांगून विविध उपयुक्त उदाहरण देत एम. जे. कॉलेजच्या उपप्राचार्य
प्राध्यापक श्रीमती देवयानी बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अवघे विश्वची
आमुचे घर - जितेंद्र प्रताप यांचा प्रेरणादायी संवाद
जितेंद्र प्रताप यांनी आपल्या
आत्तापर्यंतच्या प्रवासाचे प्रतिनिधिक स्वरूपात अनुभव कथन करतांना सांगितले की, सर्वप्रथम
या मोहिमेची सुरुवात अवघ बिहारी यांनी 1980 मध्ये केली. सुरुवातीची पंधरा वर्ष ते
एकटेच देशभर पायपीट करीत वृक्षांचे संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी फिरत
होते. त्यानंतर 1995 पासून त्यांच्या या
मोहिमेत आम्ही सहभागी झालो. माझ्यासह महेंद्र प्रताप आणि आमच्या चमूत आता 20 जण
झाले आहेत. त्यात 4 मुलींचाही समावेश आहे. आम्ही
पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशाने ज्या ठिकाणी जातो तेथील जिल्हा
प्रशासनाशी संपर्क साधून राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मदत मागतो आणि त्यानंतर
पर्यावरण संवर्धनाचे काम सुरु होते.
वृक्ष लागवड व संवर्धनाबाबतची जनजागृती
करण्यासाठी पदयात्रा सुरु केली. संपूर्ण जगाची पायीभ्रमंती करीत पर्यावरण जागृती व
इतर सामाजिक संदेश देण्याच्या या मोहिमेत हळूहळू लोक जोडले गेले. आमच्या चमूत
सामील असलेल्या पाच जणांचा एक चमू यानुसार आम्ही चार गट तयार केले आहेत. आतापर्यंत
11 देशांची व महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांची भ्रमंती केली आहे. आत्तापर्यंत आम्ही
घरी गेलेलो नसून, अवघे विश्वची आमुचे घर असल्याचे जितेंद्र प्रताप यांनी सांगितले.
यावेळी थक्क करणारे विविध प्रसंग त्यांनी कथन केले आणि विविध पैलू उलगडून सांगितले.
मुक्तपणे संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे यावेळी दिली.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
लोकराज्य स्टॉल
ला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जिल्हा
माहिती कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा
स्टॉल कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आला होता. या स्टॉलला विद्यार्थ्यांचा
उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन करतांना जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी
संवाद पर्व कार्यक्रमाचा उद्देश तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य
मासिक, महान्युज वेबपोर्टल, दिलखुलास, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र वार्षिकी या
उपक्रमांची माहिती दिली.
दरम्यान
झाडाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनासाठी ध्येयवेड्या चमूचा सत्कार
करण्यात आला. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला एम. जे. कॉलेजच्या प्रांगणात
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
सूत्रसंचालन स्वामी पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती
कार्यालयाचे सुरेश सानप, पंकज ठाकूर, नीर फाऊडेशनचे सुयोग नेवे, भावेश रोहीमारे, समाधान
पवार, सौरभ जैन, उमेश सावकारे, पल्लवी पांडे, रोशनी रोहीमारे, निलेश जोशी, रवी
परदेशी, योगेश महाले यांनी सहकार्य केले.
000
No comments:
Post a Comment