जळगाव, दि: 13 - जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची
(कडधान्य) प्रभावी अंमजबजावणी करुन तूर, मुग, उडिद यासारख्या पीकांचे उत्पादन
वाढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी केले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा
आढावा घेण्यासाठी जिल्हा अभियान समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
घेण्यात आली. या बैठकीस कृषिरत्न पुरस्कार प्राप्त विश्वासराव पाटील, कडु चौधरी,
रोहिदास पाटील या अशासकीय सदस्यांसह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे,
प्रकल्प संचालक आत्मा शिवाजीराव आमले, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे
कृषि अधिकारी मधुकर चौधरी, महाबीज चे जिल्हा व्यवस्थापक एस.एस. सावरकर आदि उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा
अभियानाच्या वार्षिक कृती आराखडयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये पीक
प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणांचे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन,
शेतकरी प्रशिक्षण, सुधारित कृषि औजरांचे वाटप, गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया
युनिट, मिनी दाल मिल आदि बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हयात तुरी, मुग,
उडीद पीकांचे प्रात्यक्षिक भौतिक लक्षांक वाटपावरही चर्चा करण्यात आली.
तसेच या बैठकीत स्थानिक पुढाकाराच्या
बाबी अंतर्गत गोडावून बांधकाम करण्यासाठी जिल्हयातील 5 संस्थांना मंजूरी देण्यात
आली. गोडावून बांधकामासाठी या संस्थांना प्रत्येकी साडेबारा लाख रुपयांचे तर
जिल्हयातील 34 शेतकऱ्यांना मिनी दाल मिलसाठी प्रत्येकी 1.25 लाख रुपयांचे अनुदान
मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली.
000
No comments:
Post a Comment