Wednesday, 30 May 2018

वाघूर प्रकल्पातून पाणी मागणीसाठी अर्ज 5 जून पर्यंत स्वीकारले जाणार


            जळगाव दि. 30 - वाघुर धरण विभाग, जळगाव अंतर्गत वाघुर प्रकल्पावरुन उजवा व डावा कालव्याद्वारे कालवा प्रवाही कालवा उपसा, लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारकांचे पाणी मागणी अर्ज 5 जून 2018 पर्यंत स्वीकारले जातील. असे उप कार्यकारी अभियंता, वाघूर धर विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
            यावर्षी वाघुर प्रकल्पात सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झालेला असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठ्यानुसार उन्हाळी हंगाम 2017-18 मध्ये दि. 1 जुन, 2018 ते 30 जुन, 2018 या मुदतीत उन्हाळी कपाशी, मका, कडवाळ, सुर्यफुल, भाजीपाला विहिरीवरील उभे पिके इ. हंगामी पिकांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.
            अर्जदारांनी नमुना नं. 7, 7 अ  व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन अर्ज दि. 5 जुन, 2018 च्या आत संबंधीत उपविभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोस्टाने देण्यात यावा. पुरेसे पाणी मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय आवर्तन सोडण्यात येणार नाही.
            सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक चारीच्या मुखाजवळच्या क्षेत्रासच मंजुरी देण्यात येईल. उडाप्याचे व चारीच्या अथवा कालव्याच्या पुच्छ भागांतील क्षेत्रास मंजुरी देण्यात येणार नाही. प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रास मंजुरी दिली जाईल. प्रत्यक्ष पास मिळाल्या शिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये. पाणी अर्जाचा निर्णय संबंधित ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डावर जाहिर केला जाईल. मंजुरी क्षेत्रावर मंजुर पिकालाच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा अथवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागात दाखवावी लागेल. पाणी अर्ज स्विकारणेची मुदत वाढविली जाणार नाही. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जावर सव्वापट पाणीपट्टी आकारली जाईल. पाणी टंचाईमुळे पिण्याचे पाण्याचे आरक्षण अथवा काही अपरिहार्य कारणास्तव मंजुरी पिकास पाणी पुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास खाते जबाबदार रहाणार नाही. उन्हाळी हंगाम 2016-17 व रब्बी हंगाम 2017-18 ची व त्या अगोदरची थकबाकी भरावी लागेल.
            मंजुरी ही पाटबंधारे अधिनियम (महाराष्ट्र शासन) 1976 च्या प्रचलित शासन नियमांचे तरतूदीचे अधीन राहील. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अधिक उत्पन्‌न घ्यावे. असे उप कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment