Thursday, 17 May 2018

आपत्तकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधून सज्ज राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


     जळगाव, दि. 17 - भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
     येथील नियोजन भवनात महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगावद्वारा आयेाजित मान्सुनपूर्व आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. निंबाळकर हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी (महसुल)  अभिजित भांडे पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आपत्तीजन्य परिस्थितीत उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करतांना त्या साधनांचा वापर यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना करता आला पाहिजे. यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिल्यास जिवीतहानी टाळण्यास मदत होते. मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेताना पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका व नगरपालिका भागातील गटारींची साफसफाई होणे आवश्यक आहे. विद्युत तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडणे, पूरपरिस्थितीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. तसेच त्यांना नदी, नाले ओलांडू देवू नये. वाहने पूर पाण्यातून नेऊन देवू नये. साथीचे रोग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य केद्रांच्या ठिकाणी पुरेसे औषधे उपलब्ध ठेवण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. तसेच ज्या गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडतो तसेच जे रस्ते पुराच्या पाण्याखाली येतात. त्यांची माहिती सर्व संबंधित यंत्रणेने घेऊन ठेवावी व त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्यात.
     यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद, होमगार्ड, जलसंपदा विभाग यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. आपत्तीजन्य परिस्थितीत खोल पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्कुबा डायव्हिंगचे तीन सेट घेण्याचे आले असून या सेटच्या वापराचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच भविष्यात जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परि‍स्थिती  उद्भवल्यास त्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ यांनी दिली.
     या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचेसह जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, होमगार्ड, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                                            000

No comments:

Post a Comment