Saturday, 19 May 2018

जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणा श्रमदानासाठी जवखेड्यात


            जळगाव, दि. 19 - पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या अमळनेर तालुक्यातील जवखेडा हे गाव या स्पर्धेत येण्याकरीता तसेच येथील ग्रामस्थांचा उत्साह वाढावा. याकरीता जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकारी व अमळनेर, चोपडा, पारोळा तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा आज (20 मे) रोजी जवखेड्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे आज आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे गेलेले असून ते बैठक आटोपून नाशिक येथून आज रात्रीच जवखेड्याला मुक्कामाला पोहोचत आहे.
            महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊन पाणीदार बनावा. याकरीता अभिनेता अमीर खानच्या पानी फाऊंडेशनने राज्यातील 75 तालुक्यांसाठी 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पारोळा व अमळनेर या दोन तालुक्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेचे शेवटचे तीन दिवस बाकी राहिले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील गावांची निवड व्हावी. याकरीता ग्रामस्थांसह जिल्ह्ययातील प्रशासकीय यंत्रणाही जोमाने कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे आज नाशिक येथील बैठक आटोपून रात्रीच जवखेड्यात मुक्कामास पोहोचत आहे. तर सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी श्रमदानास उपस्थित राहण्याबाबत त्यांनी अपर जिल्हाधिकारी यांना सुचना दिलेल्या असून पारोळा, अमळनेर, चोपडा या तालुक्यातील सर्व  तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी रविवार 20 मे रोजी सकाळीच जवखेड्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व संबंधित तहसीलदार यांना सुचना दिल्या असून जिल्ह्यातील कृषि विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी श्रमदानासाठी उपस्थित राहण्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनाही सुचना दिल्या आहेत.
            या स्पर्धेच्या निमित्ताने जवखेडा येथे जलसंधारणाची मोठया प्रमाणात कामे होत असून या स्पर्धेच्या मोहिमेचा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी 8 एपिल रोजी नगाव येथे उपस्थित राहून स्वत: श्रमदान करुन शुभारंभ केला आहे. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी या दोन तालुक्यातील विविध गावांमध्ये महाश्रमदान केले आहे. तसेच 12 व 13 मे रोजीही जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये ग्रामस्थांसोबत श्रमदान करुन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला आहे.
            गेल्या मंगळवारी अभिनेता अमीर खान व त्यांची पत्नी किरण राव यांनी जवखेडा येथे येऊन गावात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून गावात सुरु असलेल्या कामांची प्रशंसा केली होती. त्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह दुणावला असून वॉटर कप मिळविण्यासाठी ग्रामस्थ रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. त्यांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचीही चांगली साथ मिळत आहे. हे या श्रमदान मोहिमेवरुन निदर्शनास येत आहे.
000

No comments:

Post a Comment