Wednesday, 2 May 2018

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन वाढवावे ग्राम स्वराज्य अभियानातंर्गत आयोजित किसान कल्याण कार्यशाळेत खासदार ए.टी पाटील यांचे आवाहन





     जळगाव, दि. 2 - सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात शेतकऱ्यांनी शेती करतांना जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जेणेकरुन त्यांचे उत्पादन वाढल्याने उत्पन्न वाढण्यासही मदत होईल. असे प्रतिपादन खासदार ए. टी. नाना पाटील यांनी केले.
     सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सात कलमी कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्य शासनाचा कृषि विभाग आणि प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्यातर्फे ग्राम स्वराज्य अभियानातंर्गत कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरुन खासदार श्री. पाटील बोलत होते.
     याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक (आत्मा) शिवाजी आमले, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. बाहेती, शास्त्रज्ञ डॉ. संजीव पाटील, शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे, पंचायत समिती सदस्या श्रीमती चौधरी आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खासदार पाटील पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपप्ट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच त्यांनी शेतीपुरक व्यवसायाकडे वळाले पाहिजे. त्याचबरोबर तरुणांनीही नोकरीबरोबरच शेतीपुरक व्यवसाय स्वीकारले पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन शेती फायद्याची होण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठीही मार्गदर्शन होणे आवश्यक असून शेतकऱ्यांचे खात्रीशीर उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्यासाठी त्यांना जोखमीचे व्यवस्थापन व शाश्वत पध्दतीही शिकविणे आवश्यक आहे. शेतीपुरक व्यवसायामध्ये दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्यव्यवसायाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी किसान कल्याण दिवस साजरा करण्याबरोबरच तो कृतीत आणण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
     शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले पाणी आणि घेत असलेल्या पिकाची सांगड घातल्यास निश्चितच त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल असे सांगून जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, टिश्यू कल्चर, स्क्षूम सिंचनाचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास त्यांचे उत्पादन वाढून उत्पन्नही वाढले. याकरीता पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सोनवणे यांनी किसान कल्याण कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. तसेच येत्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देताना कृषि सिंचन योजनेत जेवढया शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे त्या सर्वांना पूर्वसंमती देण्यात आली असून यासाठी 120 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यातील 65 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 
कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषि सहायकांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रकल्प संचालक (आत्मा) यांचेतर्फे जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना बोलेरो जीप वाहनाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. संजीव पाटील यांनी कापूस पीकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर उपस्थितांचे आभार कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. बाहेती यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.                                                                
                                                                             000

No comments:

Post a Comment