जळगाव, दि. 5 - कापूस पिकावर बोंडअळीचा
प्रादूर्भाव हा शक्यतो ऑक्टोबर महिन्यानंतर मोठया प्रमाणात होत असल्याने बोंडअळीचा
प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेवू नये. तसेच वेचणीचा हंगाम संपताच
पऱ्हाट्या आणि पालापाचोळा यांचा शेताबाहेर कंम्पोस्ट खत तयार करण्यासाठी वापर
करावा. जेणेकरुन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. असा सूर बोंडअळी व्यवस्थापन
कार्यशाळेत विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उमटला.
रामेती,
नाशिक, जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विकास
अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पिकावरील बोंडअळी
व्यवस्थापन कार्यशाळेचे येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजन केले होते. याप्रसंगी
व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, रामेतीचे प्राचार्य सुनिल वानखेडे,
कृषि उपसंचालक अनिल भोकरे, कापूस संशोधन केंद्राचे कापूस पैदासकार संजीव पाटील,
कृषि विज्ञान केंद्र, पाल येथील शास्त्रज्ञ महेश महाजन, मोन्सँटो इंडिया लि.चे
विभागीय व्यवस्थापक सुभाष थेटे, सिंजेन्टा इंडिया लि. चे विभागीय व्यवस्थापक निलेश
गोडसे, राशी सीड्स प्रा. लि. चे विभागीय व्यवस्थापक अमित कुमार, उप विभागीय कृषि
अधिकारी नारायणराव देशमुख, गोरख लोखंडे उपस्थित होते.
मागील
वर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस
उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. येत्या खरीप हंगामात
कापसाचे उत्पादन घेतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजीबाबत त्यांच्यामध्ये जनजागृती
करण्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता या
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी आपल्या
प्रास्ताविकात सांगितले. कापूस बियाणे खरेदी करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत
मार्गदर्शन करताना रामेती चे प्राचार्य सुनिल वानखेडे म्हणाले की, शेतकऱ्यांनी
बियाणे खरेदी करतांना प्रमाणित कंपनीचेच घ्यावे. बियाणांवरील बॅच नंबर, विक्री
किंमत आदि बाबी तपासून घेण्याचे आवाहन केले.
कापूस
लागवड तंत्रज्ञानाबाबत बोलतांना संजीव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना कापसाचे अधिक
उत्पादन मिळावे याकरीता त्यांनी देशी वाणाची व बीटी बीयाणे यांची लागवड करताना दोन
काडयांमधील अंतर, कोरडवाहू जमीव व ओलसर जमीन याचा विचार करुन लागवड करावी. तर
गुलाबी बोंडअळी ओळख व नुकसानीचा प्रकार याबाबत महेश महाजन यांनी सांगितले की, कपाशीवर
बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्यास सुरुवात होत आहे हे शेतकऱ्यांला तात्काळ ओळखता आले
पाहिजे. त्याचबरोबर कोणत्यावेळी प्रादुर्भाव झाला तर किती व कशाप्रकारे नुकसान
होईल याचाही अंदाज येणे आवश्यक आहे. जेणेकरुन तातडीने उपाययोजना करता येतील.
गुलाबी
बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापन पध्दतीबाबत बोलतांना सुभाष थेटे म्हणाले, बोंडअळीचा
प्रादूर्भाव हा शक्यतो ऑक्टोबर महिन्यानंतर होत असल्याने त्याचा प्रादूर्भाव
रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेवू नये. हे शेतकऱ्यांना समजावून सांगणे गरजेचे
आहे.श्री. थेटे यांनी गुजरात पॅटर्न, आरआयबी संकल्पना व कार्यपध्दती आदिबाबतही
माहिती दिली. कापूस पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना घ्यावयाची काळजी तसेच योग्यवेळी
योग्य किटकनाशके वापरणे, वापरताना फवाणी किट वापरणे आदिंबाबत निलेश गोडसे यांनी
मार्गदर्शन केले. तर बोंडअळी निमुर्लनासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या
मोहिमेबद्दल राशी सीड्स चे अमित कुमार यांनी माहिती दिली.
एकंदरीत
येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पिकाचे उत्पादन घेताना त्यांना
अधिक उत्पादन मिळावे, शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये. त्यांना आवश्यक असलेले बी
बीयाणे, खते, किटकनाशके आदि बाबींचा कशाप्रकारे वापर करावा. कापूस पिकासाठी उपलब्ध
जमीन, पिकासाठी लागणारे पाणी, पिकाची लागवड, पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास
घ्यावयाची काळजी, करावयाच्या उपाययोजना आदिंबाबत शेतकऱ्यांना अधिकाधिक माहिती
उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने सतर्कता पाळल्याचे या कार्यशाळेच्या माध्यमातून
दिसून येत आहे.
यावेळी
शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे विमोचन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही पोस्टर प्रत्येक गावात तसेच प्रमुख ठिकाणी
लावण्यात येणार असल्याचे कृषि विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
या
कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषि पर्यवेक्षक,
कृषि सहायक मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment