Sunday, 20 May 2018

जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेने जवखेड्यात केले श्रमदान






जळगाव, दि. 20 – पाणी  फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जवखेडा या गावामध्ये आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी श्रमदान केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार स्मिता वाघ, पंचायत समितीच्या सभापती वजाताई यांनोही श्रमदान केले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यासाठी अभिनेता अमीर खानच्या पानी फाऊंडेशनने सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेसाठी राज्यातील 75 तालुक्यांची निवड केली आहे. 8 एप्रिलपासून सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा या तालुक्यांची निवड झाली आहे.

आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, एरंडोल, अमळनेर, चोपड्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, मंगळग्रह मंदिर गृप, आम्ही अमळनेर व्हाट्सअप गृपचे सदस्य, ग्रामस्थ, अमळनेर, पारोळा, एरंडोल तालुक्यातील महसूल यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील संघटनेचे सदस्य यांनी श्रमदान केले.

श्रमदानासाठी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर हे रात्रीच जवखेडा येथे मुक्कामी गेले होते. त्यांनी पहाटे पाच वाजेपासूनच ग्रामस्थांशी संवाद साधत श्रमदानास सुरवात केली. यावेळी श्रमदानासाठी विविध संघटना,  संस्थांचे  हजारो नागरीक  उपस्थित होते.

गेल्या मंगळवारी अभिनेता अमीर खान व त्यांची पत्नी किरण राव यांनी जवखेडा येथे येऊन गावात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून गावात सुरु असलेल्या कामांची प्रशंसा केली होती. तसेच वाॅटर कपसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता गावाने केली असल्याने श्रमदान करतांना ग्रामस्थांमध्ये उत्साह जाणवत होता.
                                                                             000

No comments:

Post a Comment