Tuesday, 13 November 2018

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम -सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर

      जळगाव, दि. 13 - पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत रब्बी हंगाम 2018-2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2018 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
       नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अंकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे आणि पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही उद्दिष्टे समोर ठेवून रब्बी हंगाम 2018-19 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
       ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेले पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
        अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी / लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी / लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील. दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्ख्लन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, चक्रीवादळ आणि गारपीट या टाळता न येण्याजोग्या जोखमींमुळे पिक पेरणी पासून काढणीपर्यन्तच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देय राहील.
         सर्व अन्नधान्य व गळित धान्य पिकांसाठी संरक्षित रक्कमेच्या 1.5 टक्के दराने आणि कांदा पिकासाठी संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के दराने विमा हप्ता आकारला जाईल. 
         या योजनेमध्ये प्रती हेक्टरी गहू (बागायत) विमा संरक्षित रक्कम 30 हजार, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 450/-, ज्वारी बा. विमा संरक्षित रक्कम 24 हजार, शेतक-याने भरवयाची विमा हप्ता रक्कम 360/-, ज्वारी जि. विमा संरक्षित रक्कम 24 हजार, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 360/-, हरभरा - विमा संरक्षित रक्कम 23 हजार 100, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 346.50/-, उ. भुईमुग -विमा संरक्षित रक्कम 35 हजार, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 525/-, र. कांदा - विमा संरक्षित रक्कम 54 हजार, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम 2700 रुपये इतकी आहे.
          ही योजना बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं. लि. कॉमरझोन, 1 ला मजला, टॉवर समर्थ अशोक मार्ग, येरवाडा, पुणे - 411 006 दुरध्वनी क्र 020-66240137, टोल फ्री क्रमांक 1800 209 5959 यांच्याकडून  राबविण्यात येईल.
         रब्बी हंगाम 2018-19 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बिगर कर्जदार शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बॅकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जे.डी. सी.सी. बँक यांचेशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. अथवा  www.pmfby.gov.in  या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोंदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतक-यांचा हप्ता संबंधित बँकेव्दारे भरला जाऊन सहभाग नोंदविला जातो. अधिक माहितीकरिता आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सर्व तालुका व उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव / पाचोरा / अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. असे श्री संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 
                                                                     ०००

No comments:

Post a Comment