Friday, 23 November 2018

एमएलआरसी जमीनीच्या केसेच्या सुनवणीसाठी जिल्हयात लवकरच कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यात येईल --महसूल राज्यमंत्री संजय राठोड पोहरगठ येथे लवकरच नंगारा भुवनची निर्मिती


जळगाव दिनांक 23 : जिल्हयातील महसूल विभागात एमएलआरसी जमीनीच्या केसेस मोठया प्रमाणात प्रलंबित असून या केसेसच्या सुनावणीसाठी लवकरच जळगाव येथे कालबध्द  कार्यक्रम राबविण्याबाबतची चर्चा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी झाली.  सुनावणीसाठी लवकरच जिल्हयात दौरा कार्यक्रम लावण्यात येईल  असे प्रतिपादन राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलतांना केले.
पद्मालय शासकीय  विश्रामगृह येथे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले की, महसूल विभागातील एमएलआरसीच्या जमीनीच्या सुनावणीसाठी माझ्याकडे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व अमरावती विभाग असून या विभागात सुनावणीच्या कामाला आता वेग येणार आहे. ते पुढे म्हणाले की एमएलआरसी  हा कायदा खूप किचकट होता, शासनाने क्रांतीकारक निर्णय घेवून त्यात मोठया प्रमाणात सुधारणा करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले की, महसूल  विभागात मोडी लिपीत असलेल्या जीर्ण झालेल्या अभिलेखांचे स्कॅनींग करण्याचे काम मोठया प्रमाणात हाती घेतले असून ते अभिलेखे जतन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वाशिम जिल्हयातील मनोरा तालुक्यातील पोहरगठ हे बंजारा समाजाच्या   सेवालाल महाराज यांचे समाधी स्थळ असून ते  समाजाचे श्रध्दास्थळ असल्याने या स्थळाच्या पर्यटन  विकासासाठी 450 कोटींचा कृती आराखडा मंजूरीसाठी मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठविण्यात आला होता. त्या आराखडास  मुख्यमंत्री महोदयांकडून मंजूरी मिळाली असून त्याचा पहिला हप्ता 125 कोटी रुपयांच्या  निधीस प्रशासकीय  मंजूरी  मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  ते पुढे म्हणाले  3 डिसेंबर, 2018 रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत  पोहरागठ  येथे विविध विकास कामांचा  भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी राज्यातून किमान 5 लाख बंजारा समाजाचे लोक व मान्यवर उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी बंजारा समाजात उत्साहाचे वातावरण असून राज्यातून ज्या ज्या ठिकाणाहून बंजारा समाजातर्फे निमंत्रण येत आहे त्याठिकाणी जाण्याचा  प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले की, देशात बंजारा समाजाची 10 कोटी लोकसंख्या असून राज्यात किमान एक कोटी लोकसंख्या आहे. संपूर्ण देशात सर्व राज्यात बंजारा समाज एकाच बोली भाषेत बोलतो हे ही या समाजाचे वैशिष्टय  आहे. बंजारा समाजाच्या भावी पिढीला समाजाची संस्कृती, भाषा, पेहराव  याची माहिती व्हावी यासाठी पोहरगठ येथे नंगाराच्या आकाराच्या नंगाराभुवन तयार  करण्यात येणार असून या भवनात लवकरच  वास्तूसंग्रहालय तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेस बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजु नाईक व समाजाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 0 0

No comments:

Post a Comment