जळगाव,
दि . 16 - धकाधकीच्या जीवनामुळे मानवाची दिनचर्या जशी बदलली त्याचप्रमाणे आहारातही
बदल झाले आहे. आपण घेत असलेल्या आहरावरच आपले आरोग्य अवलंबून असल्याने नागरीकांनी
आरोग्य समतोल राहण्यासाठी दररोजच्या आहारात तृणधान्याचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक
आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अभियानातंर्गत 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिन
मानण्यात येत आहे. या दिवसानिमित्त कृषि विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहु महाराज सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील,
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
शिवाजी दिवेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर
बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,
पूर्वीच्या काळी नागरीकांच्या आहारात तृणधान्याचा मोठया प्रमाणात वापर होत होता.
परंतु आता जीवनशैली बदलली आहे. पिझ्झा, बर्गरच्या जमान्यात तृणधान्याचा आहारात
वापर कमी झाला असल्यातरी आपले आरोग्य समतोल राहण्यासाठी दररोजच्या आहारात ज्वारी,
बाजरी, नाचणी, वरी यांचा एकदा तरी उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी
तृणधान्यच का खावे याबाबत मार्गदर्शन करतांना डॉ. हेमंत पाटील म्हणाले की, हल्लीच्या
जमान्यात अवघ्या 16 वर्षाच्या मुलींमध्येही हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आढळून येत
आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. धनशक्ती या बाजरीच्या वाणाची भाकरी खाल्यास हिमोग्लोबीन
वाढते. त्याचप्रमाणे यामधये पिष्टमय पदार्थाचे साठा जास्त आहे. तंतुमय पदार्थ हे
मधुमेह असणा-यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून बाजरी हे अन्न सुरक्षेसाठी
महत्वाचे पीक असल्याचेही ते म्हणाले.
ज्वारी,
बाजरी, नाचणी ही पिके आरोग्य समतोल राखण्याचे काम करतात त्यामुळे तृणधान्याचा वापर
जेवणात होणे आवश्यक असल्याचे तात्यासाहेब फडतरे यांनी सांगितले. आपल्याकडे जे
पिकतं तेच खावे असे सांगतांना आहारतज्ञ डॉ. आनंद पाटील म्हणाले की, खान्देशात
खिचडी खाण्याचे प्रमाण जास्त आहे. खिचडीमुळे स्त्रीयांमधील हिमोग्लोबीन कमी होते.
शरीरातील कॅल्शीयमच्या वाढीसाठी नाचणी महत्वपूर्ण आहे. भारत हा देश सर्वात जास्त
मधुमेही असलेला देश आहे. त्यामुळे नागरीकांनी आहारात तंतुमय पदार्थाचा वापर
वाढवावा. जीवन सुखी बनविण्यासाठी तृणधान्याचा वापर आवश्यक असल्याचा सल्लाही
त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
याप्रसंगी आहारात तृणधान्याचे महत्व या विषयावर जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, सौ. केतकी खापर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
पांढरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविका जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2018-19 अंतर्गत पौष्टिक
तृणधान्य ज्वारी, बाजरी पिकांचे प्रामुख्याने क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यात येत आहे.
तसेच सन 2018-19 व 2019-20 हे राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे म्हणून केंद्र
शासनाने जाहिर केली आहेत. त्याअनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन व स्वास्थ्य
आहाराचे महत्व याबाबत व्यापक जनजागृती होण्याच्यादृष्टिने या कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले आहे. याप्रसंगी पौष्टीक तृणधान्य दिनानिमित्त पोस्टर्सचे अनावरण
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पौष्टीक तृणधान्याचे आहारात महत्व याविषयावर
कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सादरीकरण केले. या कार्यशाळेस कृषि क्षेत्राशी
निगडीत विविध संस्थांचे प्रतिनिधी, कृषि, शिक्षण व जिल्हा परिषदेचे अधिकारी,
कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पौष्टीक
तृणधान्याच्या जनजागृती बाबत येथील जी. एस. ग्राऊंड येथुन रॅली काढण्यात आली. या
रॅलीस जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून
रॅलीचा शुभारंभ केला. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन नेण्यात येऊन रॅलीचा
समारेाप जिल्हा परिषदेजवळ करण्यात आला.
या रॅलीत कृषि महाविद्यालय, आहारतज्ञ, सामाजिक न्याय विभाग,
शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला बाल विकास विभाग, आरोग्य विभाग,
कृषि विकास अधिकारी, सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदविला.
०००
No comments:
Post a Comment