Thursday, 29 November 2018

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूबांना आर्थिक मदत तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर

     जळगाव, दि. 29 - विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटूंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या समितीपुढे एकूण 13 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी तीन प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. नऊ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली, तर एका प्रकरणात फेरचौकशी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
    या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या आठ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.       
        या बैठकीत मनोहर भिवराज घोलप, रा. मंगरुळ, ता. अमळनेर, भिमराव दौलत वाघ, रा. गोरनाळे, ता. जामनेर, मुरलीधर झुंबर पाटील, रा. पिंपळकोठे, ता. पारोळा यांना आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात जानेवारी 2018 पासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येबाबतची 131 प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी 48 प्रकरणे पात्र ठरली असून 49 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तर 13 प्रकरणांचा अहवाल प्राप्त झाला असून 21 प्रकरणे प्रलंबित आहे.
     या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, सामाजिक संस्था प्रतिनिधी वसंत लक्ष्मण महाजन, शेतकरी प्रतिनिधी रोहिदास पाटील यांचेसह पंचायत समित्यांचे सभापती, पोलीस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                              ०००

No comments:

Post a Comment