Saturday, 17 November 2018

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न पिण्याच्या पाण्याच्या योजनांची वीज कपात न करण्याचे खासदार ए. टी. पाटील यांचे निर्देश

           जळगाव, दि. 17 - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनांची वीज कपात करु नये. अशा सुचना खासदार ए. टी. नाना पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात.

          येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी सुचना दिल्यात.या बैठकीस सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, महापौर सिमाताई भोळे, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, चंदुलाल पटेल, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड आदि उपस्थित व्यासपीठावर उपस्थित होते.
         यावेळी बोलतांना खासदार श्री. पाटील म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर केला आहे. त्या तालुक्यांतील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनांची थकबाकी अभावी वीज कपात करु नये. अशा सुचना दिलेल्या असूनही जिल्ह्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज कपात केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. ही बाब लक्षात घेता नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी अडचण येणार नाही. याची दक्षता संबंधित विभागाने घेण्याचे निर्देशही श्री. पाटील यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरीकांना मुबलक वीज मिळण्यासाठी जिल्ह्यात सहा वीज उपकेंद्रांचे काम सुरु आहे. सहा ठिकाणच्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्याचे काम सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. जिल्हा खनिज प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले असून यामार्फत जिल्ह्यात 2 कोटी 34 लाख 32 हजार रुपयांच्या 58 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.
         केंद्र व राज्य शासन नागरीकांसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे. या योजनांची अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणेने व्यवस्थितरित्या करुन खऱ्या लाभार्भ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी विभागांनी तालुका पातळीवर मेळावे घेऊन योजनांची माहिती नागरीकांना करुन द्यावी. असे सांगून खासदार पाटील यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती आढावा घेताना जिल्ह्यात आतापर्यंत 6700 वीज कनेक्शन देण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देताना कोणीही गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही.  प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत जिल्हयात 127.14 किमी लांबीच्या 38 रस्त्यांची कामे झाली आहेत. तसेच मुलभूत सुविधा उपक्रमांतर्गत दूरसंचार विभागाच्यावतीने जिल्ह्यातील 1149 ग्रामपंचायतीपैकी 640 ग्रामपंचायती फायबर ऑप्टीकल केबलने जोडण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्ते बनविण्यासाठी 144 कोटी रुपयांचा विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच गिरणा पूल ते कालीकामाता मंदिरापर्यंतच्या रस्त्याला साईडपट्टया दुरुस्तीचे काम एक महिन्याच्या आत सुरु करण्यात येणार, जळगाव विमानतळ येथे 24 तास विमाने उरविण्याची सोय 31 मार्च 2019 पर्यंत करण्यात येणार असल्याचे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विषयाचा आढावा घेताना सांगितले. अमृत योजनेच्या कामांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची काम पूर्ण होताच दुरुस्ती करावी जेणेकरुन नागरीकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी दिल्यात.
          जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी होण्यासाठी जास्तीत जास्त बेघर नागरीकांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी   सर्व नगरपालिकांचे प्रकल्प आराखडे तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले. तसेच जळगाव शहरात 18 हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट असून खाजगी विकासकांच्या माध्यमातून शहरात घरकुले बांधण्याबाबत त्यांचेशी चर्चा सुरु असल्याची माहिती आयुक्त डांगे यांनी बैठकीत दिली. स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्ह्यात 1 लाख 57 हजार 605 शौचालये बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत आतापर्यंत 2 लाख 2 हजार 67 पात्र लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेतंर्गत 17 हजार 700 अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना रक्कमेचे वाटप सुरु असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी सांगितले. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात जिल्हयातील 313 गावे समाविष्ठ करण्यात आली आहे. राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरणातंर्गत जिल्ह्यातील 17 लाख 44 हजार 338 अभिलेख्यांचे स्कॅनिंगचे काम  पूर्ण झाले आहे. समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हयातील 4 लाख 60 हजार 487 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिली ते पाचवीचे 2 लाख 94 हजार 546 विद्याथी तर सहावी ते आठवी पर्यंतचे 1 लाख 94 हजार 945 विद्यार्थी शालेय पोषण आहार मिळण्यास पात्र आहेत. कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 156 प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
        या बैठकीत शामा प्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजना, अन्नपूर्ण योजनांसह केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
         बैठकीच्या सुरुवातील केंद्रीय मंत्री अनंतकुमार, माजी खासदार वाय. जी. महाजन, विश्वनाथ खडसे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
      बैठकीचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी मानले.
         या बैठकीस जिल्हयातील सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.         
000


No comments:

Post a Comment