Saturday, 30 June 2018

यावल वन विभागात 15 लक्ष 62 हजार रोपे लावण्याचे नियोजन


        जळगाव, दि. 30 - सन 2018 चे पावसाळ्यात 13 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत यावल वनविभागामार्फत 15 लक्ष 62 हजार रोपे लावण्याचे नियोजन  करण्यात आले आहे. यामध्ये रावेर- 5.96 लाख, यावल - 3.03 लाख व चोपडा -6.63 लाख अशी एकूण 15.62 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. अशी माहित श्री. संजयकुमार दहिवले, उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
            यावल वनविभागातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यातील 251 ग्रामपंचायतमध्ये 2.82 लाख एवढे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच इतर विभागामार्फत 0.87 लाख वृक्ष लावगड करण्यात येणार आहे. याकरिता विभागाच्या 16 रोपवाटिकांमध्ये 35 लाख रोपे निर्मिती करण्यात आलेली आहेत. यावल वन विभागात 1 ते 31 जुलै, 2018 या कालावधीमध्ये वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये, अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेवून 13 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन श्री. संजयकुमार दहिवले,       उप वनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगाव यांनी केले आहे.
०००

वृक्ष लागवड मोहिमेत जनतेने सहभागी होण्याचे वनविभागाचे आवाहन


            जळगाव, दि. 30 -राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्यातील नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करावी. तसेच जिल्ह्यास देण्यात आलेले 43 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास हातभार लावावा. असे आवाहन जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार व यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. संजय दहिवले यांनी केले आहे.  
            या मोहिमेतंर्गत 13 कोटी वृक्ष लागवडीच्या शुभारंभाचा कार्यक्रम एकलग्ऩ, ता. धरणगांव येथील राखीव वनक्षेत्र 391 (अ), नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 येथे 1 जुलै, 2018 रोजी सकाळी 10.00 वा आयोजित करण्यात आला आहे.
            या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय तसेच सर्व लोकसभा सदस्य़, विधान परिषद सदस्य़, विधानसभा सदस्य़ यांचेसह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख यांची उपस्थिती असणार आहे.
            50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत सन 2016 मध्ये 1 जुलै, 2016 या एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट़ ठेवून जनतेस आवाहन करण्यात आले. त्यास जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला व महाराष्ट्र राज्यात 1 जुलै, 2016 रोजी एकाच दिवशी 2 कोटी 81 लक्ष रोपे लावून उत्स्फुर्त पाठींबा दिला व याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली.
            जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून शासनाने पुढील 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. त्यानुसार सन 2017 मध्ये 4 कोटी, सन 2018 मध्ये 13 कोटी व सन 2019 मध्ये 33 कोटी असे एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट़ असतांना 5 कोटी 43 लक्ष रोपे लावण्यात आली. सन 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात 13 कोटी रोपे लागवडीचे उद्दिष्ट़ असून जळगांव जिल्हयासाठी 42 लक्ष 43 हजार चा लक्षांक देण्यात आला आहे. जळगांव जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापूर्तीसाठी 42.43 लक्ष खड्डे खोदून तयार आहेत. यावर्षी संपूर्ण जुलै महिन्यात रोपे लागवड करायची आहे. जनतेचा वृक्ष लागवडीचा उत्साह पाहता जळगांव जिल्ह्यात 45 लक्ष रोपांची लागवड निश्चितपणे केली जाईल.
            जळगांव जिल्ह्यासाठी दिलेल्या 42.43 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट़ पुर्तीसाठी वन विभाग 62.33 लक्ष उंच रोपांसह रोपे लागवडीसाठी सज्ज़ आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना वनविभागामार्फत मोफत रोपे पुरविले जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील 1150 ग्रामपंचायतींना 12.94 लक्ष रोपे मोफत वाहतुकीसह पुरविण्यात येणार आहेत. तसेच शासकीय यंत्रणा श्रमदानाने 3.18 लक्ष रोपे लागवड करण्यासाठी सज्ज़ झालेली आहेत. जळगांव जिल्ह्यात लागवड होणाऱ्या 42.43 लक्ष रोपांपैकी एकटया वनविभागामार्फत सुमारे 65 टक्के म्हणजेच 27.32 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. अशी माहिती जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.
000

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि.30 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे  रविवार दिनांक 1 जूलै, 2018   रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा  दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            रविवार, दि. 1 जुलै, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. संध्याकाळी 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.  
०००

गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री ना. दिपक केसरकर यांचा जिल्हा दौरा


        जळगाव दि. 30 – राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री ना. दिपक केसरकर हे सोमवार दिनांक 2 जुलै, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
            सोमवार दि. 2 जुलै, 2018 रोजी सकाळी 10 वा 30 मि.नी औरंगाबाद येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण. दुपारी 12 वा जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. 30 मि.नी जळगाव येथून मोटारीने वाकडी, ता. जामनेरकडे प्रयाण. दुपारी 1 वा 30 मि.नी वाकडी, ता. जामनेर येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. 30 मि.नी. जामनेर वरुन मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण, सोईनुसार नंदुरबार येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण. रात्री 11 वा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव.
         मंगळवार दि. 3 जुलै, 2018 रोजी मध्यरात्री 1 वा 30 मि.नी विदर्भ एक्सप्रेसने जळगांव वरुन नागपूरकडे प्रयाण.
००००

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका 8 जुलैपासून सुरु होणार


        जळगाव दि.30 - येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीएफ-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 8 जुलै, 2018 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी 4 व 5 जुलै, 2018 रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावा. त्यासोबत शासकीय शुल्काचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. असे आवाहन जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
          तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.  तसेच सदर मालिका चालू असतांना वाहन - 4 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत 6 जुलै रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी चार वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राहील. असेही श्री. पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
                                                                     ०००