जळगाव,
दि. 4 - कापूस हे राज्यातील महत्वाचे
नगदी पिक आहे. मागील वर्षापासून कापूस पिकावर सर्वदूर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत आहे. हे
लक्षात घेता कृषि विभाग, कृषि विद्यापिठे यांच्यामार्फत खरीप हंगाम 2018 सुरु होण्यापूर्वीपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव
होऊ नये, म्हणून विविध उपायोजना राबविण्यात आलेल्या
आहेत. या वर्षीही गुलाबी बोंड अळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होईल असे गृहित धरुन
कृषि विभागामार्फत मोठया प्रमाणात प्रचार व प्रसिध्दीचे काम करण्यात आलेले आहे.
खरीप हंगाम 2018 मध्ये असे दिसून आले की, ज्या क्षेत्रात
कापूस पिक दिनांक 15 जून 2018 पूर्वी लावण्यात आलेले आहे. अशा क्षेत्रातील कापूस पिक पाते व फुले लागण्याच्या
अवस्थेत आहे. अशा क्षेत्रात काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान
पातळीच्या वर दिसून येत आहे. या प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण
तात्काळ करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिफारस केलेल्या रासायतील किटकनाशकाची फवारणी करावी.
जेणेकरुन गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण होईल. सदर क्षेत्राच्या आजूबाजू शेतक-यांच्या
शेतातील कापूस पिकावर प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी अशा क्षेत्रातील किड नियंत्रणासाठी
मोहिम स्वरुपात किडनियंत्रणाचे काम होणे आवश्यक आहे.
शासनामार्फत गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी
निवडक क्षेत्रावर 50 टकके अनुदानावर किटकनाशके
उपलब्ध करुन देण्यात
येत आहे. तसेच जे शेतकरी कृषि विभागाच्या सल्लानुसार गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी
किडग्रस्त शिफारस केलेल्या शेतात किडनाशकाची फवारणी करीत आहे त्यांना पूर्वमान्यतेने
डीबीटीद्वारे रुपये
750/- प्रति हेक्टर या मर्यादेत
जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान उपलब्ध करुन
देण्यात येईल.
रासायनिक किटकनाशकांची फवारणी करताना त्याच
त्याच किटकनाशकांचा पुन्हा पुन्हा वापर करु नये. त्याऐवजी शिफारस केलेली किटकनाशके
आलटून पालटून वापर केल्यास गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल.
सध्याच्या हवामानात किड व रोगांच्या प्रादुर्भावात
वाढ झालेली असल्यामुळे किडनाशकांचे फवारणीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे फवारणी
करताना शेतकरी / शेतमजूर यांनी संरक्षक किटचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे किटकनाशकापासून
होणा-या विषबाधा टाळणे शक्य होईल, याकरिता शेतकरी
/ शेतमजूर यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ज्या
ठिकाणी कापूस पिक पाते व फुले लागली आहेत. जेथे प्रादुर्भाव दिसून येत नाही अशा ठिकाणी
निंबोळी अर्काची फवारणी करावी. फवारणीनंतर दर दोन दिवसांनी अशा क्षेत्रातील पात्याची
व फुलांची पाहणी करुन निरीक्षणे घ्यावीत व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास, शिफारस केलेली किटकनाशके क्विनॉलफॉस, थायडीकार्ब, प्रोफीनोफॉस वापरावीत. ज्या क्षेत्रातील कापूस दिनांक 15 जुन 2018 नंतर लावण्यात
आलेला आहे, तेथे अद्यापही पाते व फुले लागलेली नाहीत, अशा क्षेत्रात एकरी दोन फेरोमन
सापळे लावावेत व शेतांमध्ये दर दोन दिवसांनी निरीक्षणे घ्यावीत व दक्षता म्हणून निंबोळी
अर्काची एक फवारणी करावी. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सध्या पाते व फुलांमध्ये गुलाबी
बोंड अळी दिसून आलेली आहे,
अशा ठिकाणी तात्काळ रासायनिक
किटकनाशकाची फवारणी करावी. तसेच असेही निदर्शनास आले आहे की, अधिक उत्पादनाच्या नावाखाली कृषि विद्यापिठाने शिफारस
केलेली नसतानाही अनावश्यक पिक वाढ संजीवके याचा वापर शेतकरी करीत आहे. यामुळे कापूस, सोयाबीन या पिकांचा हिरवेपणा व लुसलुशीतपणात वाढ होत
असून परिणामी अशा पिकावर मोठया प्रमाणात रसशोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे
आढळून आले आहे.
तरी शेतकरी बंधुना आवाहन करण्यात येत आहे
की, अशा प्रकारच्या कुठल्याही शिफारस नसलेल्या
पिक वाढ संजीवकांचा किंवा संप्रेरकांचा (टॉनिक) वापर करु
नये.
कृषि विद्यापिठांनी शिफारस केलेली किडनाशके
व कृषि विद्यापिठाने विविध किड व रोगांसाठी दिलेले सल्ले कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in वेबसाईटवरील क्रॉपसॅप मेन्यूमध्ये उपलब्ध
आहेत, त्याचा वापर करण्यात यावा. असे आवाहन आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment