Saturday, 31 March 2018

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम.परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास 8 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

           जळगाव, दि. 31 - शासकीय सहकार व लेखा पदविका जी. डी. सी. अँड ए परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र सी. एच. एम परिक्षा जळगाव केंद्रावर दिनांक 26 ते 28 मे, 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत 8 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
           या परीक्षेसाठी परिक्षार्थींकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार असून त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्याची मुदत 28 मार्च पर्यंत देण्यात आली होती. मात्र परीक्षार्थींना बसण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा व अधिक परिक्षार्थींना या परिक्षेचा लाभ घेता यावा. या बाबी विचारात घेवून अर्ज भरण्याची मुदत 8 एप्रिल, 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सविस्तर सुचना/माहिती सहकार खात्याच्या www.mahasahakar.maharashtra.gov.in व  www.sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
             जिल्ह्यातील जास्तीत जास्त परीक्षार्थींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधवर यांनी केले आहे.
                                                                       ०००

जिल्ह्याचा वार्षिक कर्ज योजना अहवालाचे प्रकाशन बँकांनी गरजूंना अर्थसहाय्यास प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी निंबाळकर

         जळगाव, दि. ३१ - कृषि व अकृषि क्षेत्रातील विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून बँकांनी गरजूंना अर्थसहाय्य करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे दिले.
        वार्षिक कर्ज योजनेचा जिल्ह्याचा सन २०१८-१९ चा आराखडा आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी उपस्थित बॅंक अधिकाऱ्यांना संबोधित करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बॅंकेचे समन्वयक पी. पी. गिलाणकर, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था विशाल जाधवर, नाबार्डचे जी. एम. सोमवंशी, विवेक पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख, विविध बँकांचे प्रतिनिधी सर्वश्री. प्रवीण मुळे, प्रदीप व्यवहारे, संजय लोणारे, दिनेश चौधरी, अजय शर्मा, गुलशनकुमार सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी जळगाव जिल्हा वार्षिक कर्ज योजनेचा आढावा सादर करण्यात आला त्यानुसार जिल्ह्यात सन २०१८-१९ साठी पिक कर्जाकरीता ३ हजार २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर अन्य स्वरुपाच्या कृषि कर्जांसाठी (मुदतीची कर्जे) १ हजार ३६ कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट्य आहे. असे एकूण कृषि क्षेत्रासाठी ४ हजार २३६ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे.  तर अकृषिक क्षेत्रासाठी ९४२ कोटी ५ हजार रुपये, अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी ८३५ कोटी ३८ लाख रुपये उद्दिष्ट्य आहे. तर अन्य क्षेत्रांसाठी १९५ कोटी १५ लाख रुपये असे एकूण ६ हजार २०९ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा नियोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी ५ हजार ९८० कोटी ७ लाख रुपयांचे उद्ष्टि होते. त्यापैकी ४ हजार ३२९ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती श्री. गिलाणकर यांनी यावेळी दिली. यावर्षी कर्जे वाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट्य जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी मिळून पूर्ण करुन जिल्ह्यातील गरजूंना व शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसहाय्य मिळेल याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. 
                                                                   ०००

कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद येथे कृषि विस्तार सेवा पदविकेचे उदघाटन

            जळगाव, दि. 31 - कृषी खत विक्रेते यांना नवीन विषयांची माहिती व्हावी तसेच ग्रामीण भागात काम करताना शेतक-यांना त्यांच्या ज्ञानाची मदत व्हावी. या उद्देशाने भारत सरकार पुरस्कृत कृषी खत विक्रेतांकरिता कृषी विस्तार सेवा पदविका (DAESI) अभ्यासक्रम कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे सुरु करण्यात आला आहे.
                  या अभ्यासक्रमाचे उद्घाटन आत्माचे उपसंचालक के. डी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. महाजन यांनी  उपस्थितांना कोर्सविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बाहेती यांनी कृषी खत विक्रेत्यांना या पदविका सर्टिफिकेटचा भविष्यात होणाऱ्या लाभाची माहिती दिली. तर निवृत्त उपसंचालक कृषी विभाग, जळगाव पी. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वर्षभर चालणाऱ्या कोर्सविषयीची ओळख करुन दिली.
              मेनेज (MANAGE) हैद्राबाद व वनामती, नागपूर यांच्या मार्गदर्शनातून आत्मा, जळगाव यांच्या सहकार्याने कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे घेण्यात येत असलेला हा कोर्स 48 आठवड्यांचा असून प्रत्येक रविवारी प्रशिक्षण सत्र होणार आहे.
            कृषि खत विक्रेतांकरिता कृषी विस्तार सेवा पदविके (DAESI) साठी श्री. पी. के. पाटील, निवृत्त उपसंचालक, कृषी विभाग, जळगाव हे फासिलेटर (Facilator) म्हणून काम पाहणार आहेत. तर डॉ. हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद हे नोडल ऑफिसर आहेत. या कृषि खत विक्रेतांकरिता कृषी विस्तार सेवा पदविका (DAESI) साठी जिल्ह्यातील 40 कृषि खत विक्रेते सहभागी झाले आहेत. हा कोर्स एक वर्ष कालावधीचा असून कोर्स् पूर्ण करण्याऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना पदविका देण्यात येणार आहेत. असे कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
                                                                 ०००

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कोषागार कार्यालयाची पाहणी


            जळगाव, दि. 31 - येथील जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज भेट देवून विविध विभागांची पाहणी केली. मार्च अखेरचे व्यवहार तपासणी निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास भेट दिली. जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पी. एस. पंडित यांनी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अप्पर कोषागार अधिकारी एस. आर. नारखेडे, के. बी. सोनार, उप कोषागार अधिकारी पी. बी. महाले, एल. सी. पालवी यांचेसह प्रशांत कासार, विशाल सोनार, आर. के. पवार, जितेंद्र नेहेते, संदिप तडवी, हुकुमचंद बोरुडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
         यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वित्त विभागांतर्गत सुरु केलेल्या सर्व ऑनलाईन प्रणाली सेवार्थ, ग्रास, सीएमपी स्टँम्प्स मोडयूल, निवृत्तीवेतन, वाहिनी, बीम्स प्रणाली याबाबत सविस्तर माहिती घेतली. जिल्हाधिकारी यांनी कोषागार कार्यालयातील सर्व शाखांच्या कामाचा आढावा घेवून मुद्रांक तपासणी व सुरक्षा कक्षाची पाहणी करुन कोषागार कार्यालयाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच मार्च अखेरचे सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी विविध सूचना दिल्या. जिल्ह्यातील कोणत्याही विभागाचे अनुदान परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सुचनाही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी यांचा कोषागार कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला व त्यांच्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.               
                                                                        ०००

वनविभागामार्फत वृक्षलागवडीसाठी जनजागृती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चित्ररथास दाखविली हिरवी झेंडी

          जळगाव, दि. 31 - शासनाच्यावतीने राज्यात येत्या तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेबाबत राज्यातील नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वन विभागाच्यावतीने चांदा (चंद्रपूर) ते बांदा, सावंतवाडी (सिंधुदूर्ग) वृक्ष लागवड जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. आज या चित्ररथाचे आगमन जळगाव शहरात झाले. यानिमित्ताने येथील काव्यरत्नावली चौकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चित्ररथाचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यात 13 कोटी वृक्ष लागवड, हरीतसेना, महाराष्ट्र वनसंवर्धन इ. बाबत जनजागृती होण्यासाठी या चित्ररथास हिरवी झेंडी दाखविण्यात आल्यानंतर चित्ररथ मार्गस्थ करण्यात आला.
            याप्रसंगी जळगावचे उप वनसंरक्षक डी. डब्लू, पगार, यावल चे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वन परिक्षेत्र अधिकारी पाटील यांचेसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
          या चित्ररथाच्या गाडीत मोठ्या प्रोजेक्टरवर वृक्षलागवड, हरीतसेना व महाराष्ट्र वन संवर्धन संदर्भात जनजागृतीची चित्रफित दाखवण्यात येत आहे. चित्ररथाव्दारे जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात येणार असून वृक्ष लागवडीचे महत्व विशद केले जाणार असून नागरीकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी जाणीवजागृती करण्यात येणार आहे. 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला दोन वर्षापासून जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये अजून वाढ होणे अपेक्षित असल्याचे उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी याप्रसंगी सांगितले.
                                                                         ०००

सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

           जळगाव, दि. 31 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा रविवार दि. 1 एप्रिल व सोमवार दि. 2 एप्रिल, 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
           रविवार दि. 1 एप्रिल, 2018  रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि. नी पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 ते सायं 5 वा. 30 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 5 वा. 30 मि. नी. दोनगांव, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 6 वा. दोनगाव, ता. धरणगाव येथे आगमन व दोनगाव येथील विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7 वा 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
         सोमवार दि. 2 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत  पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सायं 5 वा. जवखेडा, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 5 वा. 30 मि.नी. जवखेडा, ता धरणगाव येथे आगमन व आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थित. सायं 6 वा. 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 10 वा. 40 मि. नी. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. 10 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 11 वा. 13 मि. नी. अमरावती-मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
                                                                 ०००

Friday, 30 March 2018

केंद्र पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचे ई भूमीपूजन संपन्न जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु - पालकमंत्री चंद्रकांत पाटील कायद्याच्या चौकटीत राहून गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरु





जळगाव, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून शासनपातळीवर काम सुरु असल्याचे प्रतिपाद  महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
          केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत जळगाव शहर पाणी पुरवठा योजना व जिल्ह्यातील  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचा ई-भूमीपूजन समारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते आजा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार चंदूलाल पटेल, आमदार एकनाथराव खडसे, आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, माजी मंत्री सुरेश जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून अमृत अभियानांतर्गत जळगाव शहरासाठी 249 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे काम 24 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. विकेंद्रीत पाणीसाठा वाढविण्यावर शासनाचा भर असून सर्वसामान्य माणसाला सुखी, आनंदी ठेवण्यासोबतच सोईसुविधा देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या गाळेधारकांना कायद्याच्या चौकटीत राहून सर्वोतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. लोणीकर म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानात जळगाव शहरासह राज्यातील 44 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातच्या धर्तीवर मुख्यमंत्री पेयजल योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. राज्यात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. राज्यात ४ हजार कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सांगितले. आज जिल्ह्यातील 22 योजनांचे ई भूमिपूजन करण्यात आले आहे. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी केले. ज्योती अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमास उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती श्रीमती ज्योती इंगळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती प्रतिभा कापसे, सभागृह नेता नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेता वामनराव खडके यांचेसह महापालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत ई-भूमिपूजन झालेले प्रकल्प (रक्कम रु.)
          जळगाव तालुका – भोलाणे- 41.97, बिलवाडी- 28.12. जामनेर तालुका- गोंडखेल- 54.09, नवी दाभाडी- 37.11, नांद्रा हवेली- 48.66, मोहाडी-125.42, चिलगाव- 48.08, पिंपळगाव गोलाईत-38.65. धरणगाव तालुका- भोद बु.- 45.69, चांदसर बु.- 31.37, चिंचपुरे- 38.90, अमळनेर तालुका- डांगर बु. 98.00, चाळीसगाव तालुका- वाघळी-157.33, चोपडा तालुका- सत्रासेन-77.82, माचले-41.72, कृष्णापुर-35.78, मजरे हिंगोणे-48.19, गलंगी-29.34, गोरगावले खु. 36.45, भवाळे-34.06, जलस्वराज्य टप्पा-2 अंतर्गत जामनेर तालुका- हिंगणे कसबे- 46.95 लाख रुपयांच्या कामांचे ई - भुमिपुजन आज करण्यात आले.
000

जैन फार्म फ्रेश फुडसच्या मसाले प्रक्रिया प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन संपन्न



           

         जळगाव, दि. 30 - जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ची सहयोगी कंपनी जैन फार्म फ्रेश फुडसच्या मसाले प्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन आज महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते कोनशिला अनवारण करुन करण्यात आले.  
          याप्रसंगी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार रक्षा खडसे, आ. चंदुलाल पटेल, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आ. संजय सावकारे, आ. डॉ. सतीश पाटील, आ. हरिभाऊ जावळे, आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ. उन्मेश पाटील, आ. किशोर पाटील, महापौर ललित कोल्हे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल जैन आदि उपस्थित होते.
          सर्वसामान्य नागरिकांना देखील उच्च प्रतिच्या मसाल्याची चव चाखता यावी, या प्रमुख उद्देशाने जैन उद्योग समुहाने या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या मसाले प्रक्रिया प्रकल्पाची वार्षिक क्षमता २४ हजार टन इतकी असून यामध्ये आलं, लसुण, कांदा, मिरची यांची पेस्ट तयार केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरडा मसाला देखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुर्णता सुरक्षित आणि उच्च दर्जाचे मसाले ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. एअर फिल्टरच्या माध्यमातून शुद्ध हवेचा पुरवठा केला जाणार असून त्यामुळे मालाचा दर्जा नियंत्रित राखण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे. या प्रकल्पासाठी जैन उद्योग समुहाने १०० कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल जळगाव, धुळे, नंदुरबारसह मध्यप्रदेश व गुजरातला लागून असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांकडुन घेतला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कान्हदेशातील शेतकरी जैन फार्मफ्रेश फुडसच्या करार शेतीशी जोडले जाणार असुन त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर वाढीस मोठा हातभार लागणार असल्याचे श्री. अशोक जैन यांनी सांगितले. प्रकल्पातून तयार होणारा माल सुरवातीच्या काळात प्रामुख्याने निर्यात केला जाणार आहे. आगामी काळात भारतात उपलब्ध होणार आहे.
          या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली.
000

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्काराचे वितरण शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पुरविणार- कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर










जळगाव, दि. ३० (जिमाका वृत्तसेवा) : नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या शासनाचा प्रयत्न असून जैन इरिगेशन सारख्या संस्था या क्षेत्रात पुढे आल्यास शासनातर्फे त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे केले.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. तर्फे अखिल भारतीय पातळीवर कृषि क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पद्मश्री                 डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वडनेर भैरव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील प्रगतीशील तरुण शेतकरी अविनाश मनोहर पाटोळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  
कार्यक्रमाला  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार रक्षा खडसे, आमदार सर्वश्री. चंदूलाल पटेल, एकनाथराव खडसे, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, शिरीष चौधरी, उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, कवी ना. धों. महानोर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गुणवंत सरोदे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनिल जैन आदी उपस्थित होते.
श्री. फुंडकर म्हणाले, पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री.पाटोळे यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्पादनात वाढ केली. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो त्या डॉ. अप्पासाहेब पवार यांनी राज्यातील कृषी क्षेत्रात भरीव काम केले असून शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे. शेताकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे असेच कार्य जैन इरिगेशन मार्फत करण्यात येत असून शेतीशी निगडीत विविध क्षेत्रात या संस्थेचे कार्य उपयुक्त असे आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशा संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री. लोणीकर म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीचे उत्पन्न वाढले आहे. मात्र, विपणनात शेतकरी मागे आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात फक्त शेतकऱ्यांची औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून या औद्योगिक वसाहतीत शेतमालावर प्रक्रिया करुन तो बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. हुशार तरुणांनी आता शेती कसण्यासाठी पुढे येत नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबर विक्री कलाही आत्मसात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
श्री. पवार म्हणाले, चांदवडसारख्या अवर्षण प्रवण तालुक्यात आधुनिक पद्धतीने शेती करीत अविनाश पाटोळे यांनी यश मिळविले आहे. डॉ. अप्पासाहेब पवार यांना अशाच प्रकारची नवीन पिढी अपेक्षित होती. कापसावरील बोंडअळी, गव्हावरील तांबेरा, केळीवरील करपा रोग अशा कृषीविषयक प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ व संशोधकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शेतमालाची किंमत वाढली, तर महागाई वाढते हा विचार आता बदलण्याची गरज आहे. तसेच शेतीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील नवनवीन बदल व संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली, तर शेतीत बदल घडून येतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भवरलाल जैन व अप्पासाहेब पवार यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना श्री. पाटोळे म्हणाले की, सुरुवातीला वडिलांना मदत म्हणून शेतीस सुरुवात केली. त्यानंतर शेतीत आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने यश मिळाल्याचे सांगितले. संकटातून मार्ग काढतांना वडील मनोहर पाटोळे यांच्यासह कुटुंबीयांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो. या पुरस्काराचे यंदा १४ वे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, दोन लाख रुपये व पुरस्कारार्थींचा सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र  अशा पाच महसूल विभागातून शेतकऱ्याची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यावर्षी उत्तर महाराष्ट्रातून ही निवड करण्यात आलेली आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर व निवड समितीच्या सदस्यांनी ५० शेतकऱ्यांमधून श्री. पाटोळे यांची निवड केली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. ज्योती अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.  तर अशोक जैन यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००