Thursday, 8 March 2018

जळगाव जिल्हा कृषि महोत्सवाचे थाटात उद्घाटन संपन्न - उत्पादकता वाढीबरोबरच विक्री व्यवस्था वाढीसाठी कृषि महोत्सव महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

जळगाव, दि. 8 - शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग राबवावेत. या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांची उत्पादकता वाढावी. त्याचबरोबर शेतकरी ते ग्राहक अशी विपणन साखळी तयार व्हावी. यासाठी जिल्हा कृषि महोत्सव महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.
            शासनाचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खान्देशातील सर्वात मोठ्या जळगाव जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन आज येथील सागर पार्क मैदानावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर बोलत होते.
            याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, उपमहापौर गणेश सोनवणे, समाजकल्याण समिती सभापती प्रभाकर सोनवणे, शिक्षण समिती सभापती पोपट (तात्या) भोळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती रजनी चव्हाण, आरोग्य समिती सभापती दिलीप पाटील, कृषि महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी मधुकर चौधरी, पारोळा पंचायत समितीच्या सभापती सुनंदा पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंखे, आदि मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा तसेच ग्राहकांनाही दर्जेदार शेतमाल मिळावा यासाठी शेतकरी ते ग्राहक साखळी तयार होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या प्रदर्शनात शासकीय योजनांबरोबर शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, खते, बि-बियाणे यांच्या कंपन्यांचे स्टॉल असून दररोज विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन केलेले आहे. या सर्वांचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन त्यांनी जागतिक महिला दिनाच्या उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.
            जागतिक पातळीवर चांगल्या दर्जाची फळे, फुले व शेतमालाला मोठया प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घ्यावे. तांदळवाडीतील शेतकऱ्यांनी  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उच्च्‍ प्रतीच्या केळीचे उत्पादन घेतल्याने येथील केळीची मोठया प्रमाणात  निर्यात होत आहे. या प्रदर्शनात शेतीक्षेत्राशी निगडीत चांगली माहिती असल्याने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी केले.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विविध स्टॉल भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. सुरुवातीस शाहिर शिवाजीराव पाटील यांनी कृषि गीते सादर केली.
अजा केळी निर्यातीवर चर्चासत्राचे आयोजन
          या प्रदर्शनात दररोज शेतीशी निगडीत विविध विषयांवर मान्यवरांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत केळी निर्यात: जळगाव जिल्ह्यासाठी संधी या विषयावर डॉ. के. बी. पाटील, उपाध्यक्ष टिश्युकल्चर रोपे विपणन, जैन इरिगेशन यांचे तर दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत केळी प्रक्रिया या विषयावर डॉ. डी. एन. कुलकर्णी, अध्यक्ष, शाश्वत शेती व यावल येथील प्रगतीशील शेतकरी अशोक गडे यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले. प्रदर्शनाची सविस्तर माहिती व  आयोजनामागील भूमिका आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांनी विशद दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर उपस्थितांचे आभार आत्माचे उपसंचालक के. डी. महाजन यांनी मानले.
लोकराज्य स्टॉल ला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
       या प्रदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्या वतीने राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला  आहे. या स्टॉलला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. नागरीकांनी या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
             या महोत्सवात कृषि क्षेत्राशी संबंधित शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, कृषीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, सेंद्रिय शेतमाल विक्रीचे दालन, धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, महिला बचतगटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे दालन, आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीची सोय याबरोबरच ड्रोनद्वारे पीकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक ही प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या प्रदर्शनात शेती क्षेत्राशी निगडीत दोनशे हून अधिक कंपन्याचे 248 स्टॉल उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन 8 ते 12 मार्च या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहेत. या प्रदर्शनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी व नागरीकांनी भेट देऊन लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
000



No comments:

Post a Comment