Monday, 5 March 2018

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 166 अर्ज दाखल ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करणार - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर







            जळगाव, दि. 5 (जिमाका) :- जिल्ह्यातील विविध पतसंस्थामध्ये अडकलेल्या ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम त्यांना परत करण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करण्यात येत आहे. या आराखड्यानुसार बंद पडलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्त करणे, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा लिलाव करुन येणाऱ्या रक्कमेतून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सुचना सहकार विभागाला करण्यात आल्या आहे. याबाबत सहकार विभागामार्फत कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिली.
        दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या जागेवर जावून जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित ठेवीदारांनी विविध पतसंस्थामध्ये अडकलेल्या ठेवींची रक्कम लवकरात लवकर मिळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली असता त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 166 तक्रार अर्ज दाखल झाले. 
            या लोकशाही दिनास जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, निवासी उप‍ जिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था विशाल जाधवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  बी. ए. बोटे, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment