जळगाव, दि. 27 - येत्या पावसाळ्यात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्यात साडेबेचाळीस लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांनी या मोहिमेत वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांच्या संगोपनाचेही नियेाजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अतंर्गत जिल्ह्याला 42 लाख 47 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आज अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक डी. डब्लू. पगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी आर. एस. तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अधिकारी आर. आर. नंदनवार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या वर्षी जिल्ह्याला 42 लाख 47 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 12 लाख 56 हजार, जळगाव वन विभागास 6 लाख, यावल वन विभागास 13 लाख 73 हजार, सामाजिक वनीकरण विभागास 6 लाख तर इतर विभागांना 3 लाख 18 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात 46 लाखापेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती श्री. पगार यांनी बैठकीत दिली. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला. तसेच वृक्षांच्या लागवडीबरोबरच त्यांच्या संगोपन होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना श्री. गाडीलकर यांनी दिल्यात.
त्याचबरोबर जिल्ह्यात हरित सेनेची सभासद नोंदणी वाढण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी वन विभागाच्यावतीने उपस्थितांना केले.
000
No comments:
Post a Comment