·
शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी
पोलीस वसाहतीमध्ये जागा उपलब्ध करुन देणार
·
जिल्हा कृषि महोत्सवात
झाली कोट्यावधींची उलाढाल
जळगाव, दि. 12 - शेतकऱ्यांनी वेगवेगळया तंत्रज्ञानावा वापर
करुन शेतमालाची उत्पादकता वाढवावी. त्याचबरोबर शेतमाल विक्रीचे तंत्रही अवगत
करावे. जिल्हा कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून हे विक्रीचे तंत्र मिळण्यास निश्चितपणे मदत होईल. असा ठाम विश्वास
जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज व्यक्त केला.
शासनाचा
कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खान्देशातील सर्वात मोठ्या जळगाव जिल्हा कृषि
महोत्सवाचा समारोप आज येथील सागर पार्क मैदानावर जिल्हा पोलीस अधिक्षक कराळे
यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत
होते.
याप्रसंगी
व्यासपीठावर कृषि महोत्सव संयोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास
बोडके, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी मधुकर चौधरी, पाल येथील कृषि विज्ञान
केंद्राचे कार्यक्रम अधिक्षक डॉ. एस. पी. सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी.
जडे, उपविभागीय कृषि अधिकारी गोरख लोखंडे, जिल्हा बीज गुणक अधिकारी सोनवणे, आत्मा
चे प्रकल्प उपसंचालक के. डी. महाजन आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना श्री. कराळे पुढे म्हणाले की, बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. त्याने पिकविलेल्या
शेतमालाला चांगला भाव मिळावा तसेच ग्राहकांनाही दर्जेदार शेतमाल मिळावा यासाठी
शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालय व पोलीस वसाहत
येथे जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस
श्री. कराळे यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
जिल्हा
कृषि प्रदर्शन आयोजनामागील भूमिका सांगताना आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले म्हणाले
की, जळगाव मध्ये अशाप्रकारचे प्रदर्शन प्रथमच होत आहे. या प्रदर्शनास जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी भेटी देऊन येथील नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेतले. तसेच या प्रदर्शनात
आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्र व परिसंवादात सहभाग घेतला. ग्राहकांनीही
सेंद्रीय शेतमाल तसेच इतर वस्तुंची मोठया प्रमाणात खरेदी केली. या प्रदर्शनात
गेल्या पाच दिवसात अंदाजे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल झाल्याची
माहितीही श्री. आमले यांनी दिली.
या महोत्सवात कृषि
क्षेत्राशी संबंधित शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, कृषीतील आधुनिक
तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, सेंद्रिय शेतमाल विक्रीचे दालन, धान्य महोत्सव, खाद्य
महोत्सव, महिला बचतगटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे दालन, आधारकार्ड नोंदणी
व दुरुस्तीची सोय याबरोबरच ड्रोनद्वारे पीकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक असे शेती
क्षेत्राशी निगडीत दोनशे हून अधिक कंपन्याचे 248 स्टॉल उभारण्यात आले आहे. या
स्टॉलधारकांमधील उत्कृष्ट स्टॉलधारक म्हणून ड्रोनद्वारे पीकांची फवाणीचे
प्रात्याक्षिक दाखविणाऱ्या सिमट्रॉनिक्स ऑटोमेशन प्रा. लि. यांना प्रथम क्रमांकाचे
पारितोषिक देण्यात आले. तर शेती यंत्रणा ॲग्रो मशिनरी या स्टॉलला द्वितीय
क्रमांकाचे, सहृयाद्री फामर्स प्रा. लि. कंपनी या स्टॉलला तृतीत क्रमांक तसेच
महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीच्या स्टॉलला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन जिल्हा पोलीस अधिक्षक व मान्यवरांच्या हस्ते
गौरविण्यात आले.
त्याचबरोबर
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आत्मा व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार
करण्यात आला.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी तर उपस्थितांचे आभार आत्माचे प्रकल्प उपसंचालक
के. डी. महाजन यांनी मानले.
000
No comments:
Post a Comment