जळगाव, दि. २० - आपत्तीच्याप्रसंगी
प्रसंगावधान राखून वेळेचा अपव्यय टाळल्यास जीवीत हानी टळण्यास निश्चितपणे मदत होवू
शकते. ही बाब लक्षात घेऊन नागरीकांनी अशावेळी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले.
महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन
कार्यक्रमांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव द्वारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या
संयुक्त विद्यमाने 14 मार्च पासून जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहाचा समारोप आज येथील नियोजन भवनात
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर एसडीआरएफ धुळे टीमचे लिडर पोलीस निरिक्षक श्री. के. यू.
पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. रामलाल शर्मा व श्री. इश्वर सरदार, जिल्हा
आपत्ती निवारण अधिकारी एन. आर. रावल आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.
निंबाळकर म्हणाले की, पुर, भुकंप, चक्रीवादळ, आग अशा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी
नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ते भयभीत झालेले असतात. परंतु
नागरीकांना अशा आपत्तीला सामोरे जाण्याची पध्दत माहिती असल्यास ते अशावेळी
प्रसंगावधान दाखवून वेळेचा अपव्यय टाळू शकतात. यामुळे जीवीत हानी टाळण्यास मदत होते.
त्यामुळे अशा आपत्तीच्यावेळी नागरीकांनी आपली जबाबदारी ओळखून प्रशासनास मदत करणे
आवश्यक असते. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी जिल्हा आपत्ती निवारण विभाग व राज्य आपत्ती
प्रतिसाद दल आपली भूमिका पार पाडीतच असतात. परंतु त्यांना प्रशिक्षित नागरीकांचे सहकार्य
मिळाले तर अशा आपत्तींवर कमी वेळेत मात करता येते. यासाठी नागरीकांनी
याप्रकारच्या प्रशिक्षणाची माहिती करुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
या
सप्ताहातंर्गत जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकारी व कर्मचारी
यांच्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात, जळगाव
शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमधील अग्नीशमन कर्मचाऱ्यांसाठी
महानगरपालिका, जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अधिकारी,
कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांचेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात, जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक,
पोलीस मित्र, निर्भया पथकाचे स्वयंसेवक यांचेसाठी मंगलम हॉल, पोलीस कवायत मैदान
येथे भुसावळ, यावल, रावेर, बेादवड, मुक्ताईनगर तालुक्यातील शोध व बचाव पथके, मंडळ अधिकारी, तलाठी,
ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचेसाठी हतनुर धरण येथे तर जळगाव, जामनेर, एरंडोल, चोपडा, धरणगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव,
चाळीसगाव तालुक्यातील शोध व बचाव पथकांसाठी जिल्हा नियोजन सभागृहात उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ तसेच
आकस्मीत आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप आदिंबाबतचे
प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच या जनजागृती व प्रशिक्षण
सप्ताहाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील एम. जे. कॉलेजच्या एकलव्य क्रिडा संकुलातील
जलतरण तलावात खोल पाण्यात बुडालेल्या व्यक्तीस बाहेर काढण्याबाबतचे खास प्रशिक्षण
देण्यात आले. यासाठी ठाणे येथील स्कुबा डायव्हीग मास्टर ट्रेनर डॉ. विश्वास
सापटणेकर यांनी त्रिस्थाच्या स्कुबा डायव्हीग पथकास खोल पाण्यात बुडालेल्या
व्यक्तीस बाहेर काढण्याबाबत स्कुल डायव्हीग सेटसह प्रशिक्षण दिले.
यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल,
धुळेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन
सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास तहसीलदार अमोल निकम यांच्यासह विविध
यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा
आपत्ती निवारण अधिकारी एन. आर. रावल यांनी केले.
000
No comments:
Post a Comment