Saturday, 3 March 2018

जिल्हा कृषि महोत्सव 2018 चे आयोजन खान्देशातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन 8 मार्चपासून सागर पार्क मैदानावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे संयोजन समितीचे आवाहन



·       


           कृषि चे भव्य प्रदर्शन
·         प्रमाणित सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन
·         धान्य महोत्सव
·         खरेदीदार विक्रेता संमेलन
·         परिसंवाद व चर्चासत्र
·         शेतकरी सन्मान समारंभ
·         खाद्य महोत्सव
·         ड्रोनद्वारे शेतमालाच्या फवारणीचे प्रात्यक्षिक
·         आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीची सोय प्रदर्शनात उपलब्ध. ही प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये.
     जळगाव, दि. 3 - कृषी विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यत पोहोचविणे. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील संशोधनाचा विस्तार करणे. शेतकऱ्यांमधील विपणन साखळी सक्षम करणे. समुह/गट शेतीसाठी शेतकऱ्यांना संघटीत करणे. शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे. शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा. ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा, याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीश्रृंखला विकसित करणे. कृषीविषयक परिसंवाद व व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाण घेवाणीव्दारे शेतक-यांच्या समस्यांचे निवारण करणे. विक्रेता व  खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे. हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून येत्या 8 मार्चपासून सागर पार्क मैदानावर राज्य शासनाचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देशातील सर्वात मोठया कृषि प्रदर्शनाचे येथील सागर पार्क मैदानावर 8 ते 12 मार्च, 2018 या कालावधीत भव्य जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस प्रकल्प संचालक (आत्मा) शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आदि उपस्थित होते.
            जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील यांच्या हस्ते व महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सागर पार्क मैदानावर होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार असल्याचेही श्री. सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
        कृषि प्रदर्शनाची संकल्पना - या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत शेतक-यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतक-यांच्या माध्यमातून शेतक-यांना आपापसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होण्यास मदत करण्यात येणार आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्याने शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकणार आहे. शेतक-यांना शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतक-यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपुरक व्यवसाय इत्यादीबाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट तर घडणारच आहे. परंतु सामान्य शेतक-यांना त्यांच्या शंकाचे निरसनही करुन घेता येणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सवाचे आयोजन या प्रदर्शनात करण्यात आले आहे.
        शासकीय व शासन प्रायोजित उपक्रमाचे स्वतंत्र दालन - या प्रदर्शनात राज्य शासनाचा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ (विस्तार व प्रशिक्षण), महसूल विभाग, समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, विविध संशोधन केंद्रे, विविध कृषी विज्ञान केंद्रे, ग्रामीण विकास विभाग, स्वच्छ भारत अभियान, तंटामुक्ती अभियानाबरोबरच जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य मासिकाचे दालन असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पशुधन विकास महामंडळ, वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, एन. सी. डी. ई. एक्स. नाबार्ड, रेशीम विकास विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अग्रणी बँक, अपेडा, जिल्ह्यांतील दुग्ध उत्पादन संस्था बी.एस.एन. एल, मेडा (महाउर्जी) या शासन प्रायोजित उपक्रमांबरोबरच गृहोपयोगी वस्तु व बचत गटांचे स्टॉल, शेतीशी निगडीत औजारे व मशिनरी, सेंद्रीय शेती दालन, धान्य व खाद्य महोत्सवाचाही या प्रदर्शनात सहभाग राहणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयी असणाऱ्या अडीअडचणी, शंकाचे निरसण तर करता येणारच आहे. त्याशिवाय नागरीकांना आपल्याला लागणारा शेतमाल शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर ड्रोनद्वारे शेतमाल फवारणीचे प्रात्यक्षिक हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
            सहभागी होणाऱ्या संस्था व कंपन्या - या प्रदर्शनात शेतमालास लागणारी खते, ॲक्वाकल्चर, औषधे, बायोटेक्नॉलॉजी, बी-बियाणे, टिश्यू कल्चर, औजारे, पाणी व्यवस्थापन, यंत्रसामुग्री, ऑटोफार्मिंग टेक्नॉलॉजी, ट्रॅक्टर्स इक्विपमेंटस, सौरऊर्जा, पशुखाद्य व औषधे, सिंचन साधने, डेअरी इक्विपमेंटस, फलोत्पादक, पोल्ट्री सोल्युशन, पॅकेजिंग, कृषि अर्थसहाय्य, साठवणुक, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन, शासकीय विविध विभाग, कृषी विषयक पुस्तके व नियतकालिके या कंपन्याही सहभागी होणार आहे. या प्रदर्शनात दोनशे हून अधिक कंपन्या सहभागी होणार असून यासाठी 248 स्टॉल उभारण्यात आले आहे. याठिकाणी प्रिफॅब्रिकेटेड स्टॉल्स, चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन, शेतकरी सन्मान समारंभ, खरेदीदार विक्रेता संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. 
10 मार्च रोजी होणार प्रगतीशील शेतकरी व गटांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान
            आत्मा अंतर्गत चांगले काम करणारे शेतकरी व गट यांचा सन्मान 10 मार्च रोजी राज्याचे महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक श्री. शिवाजी आमले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये - शेतीमध्ये प्लास्टीकचा वापर, थेट पणन विषयी मार्गदर्शन, भव्य सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्यांची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल, जलयुक्त शिवार अभियानाचे जिल्ह्यातील योगदान व यशस्वीता, शेतमालाचे क्लिनिंग, ग्रेडींग, पॅकेजींग व ब्रॅण्डिंग, नियंत्रित शेतीचे व्यवस्थापन, शेतमाल आधारीत प्रक्रिया उद्योग व निर्यात, हायड्रोफोनिक्स मुरघास विषयी माहिती, शीतसाखळी विषयी माहिती, भव्य धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव ही या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
            जिल्हा कृषि प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समिती नेमण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक (आत्मा) शिवाजी आमले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे.
            हे प्रदर्शन 8 ते 12 मार्च या कालावधीत दिवसभर सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार असून जिल्ह्यातील शेतकरी व नागरीकांनी या प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment