Friday, 16 March 2018

जलजागृती सप्ताहाचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न भव्य जलदिंडीचे आयोजन









जळगाव, दि.16- महाराष्ट्र शासनाचे जलजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. 22 मार्च हा जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो. या अभियांनाअंतर्गत 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार असून आज सकाळी जलदिंडीचे जिल्हाधिकारी  श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते पूजन करुन जलजागृती सप्ताहाचे उदघाटन झाले. या वेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री टी.पी. चिनावलकर, आहिरे, विसवे, गावीत आदि मान्यवर उपस्थित होते.
        सकाळी 8.30 वाजता शहरातील सिंधी कॉलनी येथील वरुणदेवता मंदीरापासून जलदिंडीचा प्रारंभ झाला. या जलदिंडीत महानगर पालिका शाळा क्र. 55, न्यू आदर्श इंग्लीश मीडीअम स्कूलचे विद्यार्थी शिक्षक जल बचतीचे संदेश देणारे फलक हातात घेवून सहभागी झाले होते. ही जलदिंडी सिंधी कॉलनी आकाशवाणी चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील  नियोजन भवनात या जलदिंडीचा समारोप झाला.
जलशिक्षक निर्माण करुन जलजागृती करा… -- दिवेकर
जलशिक्षक निर्माण करुन समाजात जलजागृतीचे काम प्रभावीपणे करता येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी केले. जलजागृती सप्ताहानिमित्ताने जळगाव पाटबंधारे विभागातर्फे नियोजन भवनात आयोजित उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा कृषि अधीक्षक श्री. विवेक सोनवणे, जिल्हा क्रीडाअधिकारी सुनंदा पाटील, जलश्री फाऊंडेशनच्या शास्त्रज्ञ स्वाती संवत्सर, कृषीभूषण सागर धनाड, जलनायक, शिवाजी भोईटे, जैन उद्योग समुहाचे श्री. जडे, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी दैनिक साईमतचे संपादक प्रमोद ब-हाटे, विजय पाठक, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, नीर फाऊडेशनचे आढाव आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विवेक सोनवणे यांनी या  प्रसंगी जळगाव जिल्हयात झालेल्या जलयुक्त कामांची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. जलयुक्त कामांमुळे जिल्हयात निर्माण झालेला जलसाठयाची क्षमता भूगर्भातील वाढलेली जलपातळी तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 4थ्या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या गावांची माहिती दिली.
श्रीमती स्वाती संवत्सर यांना मार्गदर्शन करतांना जल आणि जंगल यांचे महत्व सांगताना जंगल  असेल तर जल असेल जल असेल तर जीवन असेल. जलनायक शिवाजी भोईटे यांनी प्रत्येक गावात पोलीस पाटलांच्या धर्तीवर एक जलपाटील असावा. व त्या गावातील पाणी विषयक कामात त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगून विद्यार्थी व तरुणांच्या मदतीने वनराई बंधारे बाधावे असे सूचविले. कृषिभूषण श्री. सागर धनाड यांनी प्लॅस्टीकचा समाजात होणारा अतिरेकी वापरामुळे जमीनीतील जलस्त्रोत बंद होत असून जमीन नष्ट होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार विजय पाठक यांनी जल वाचविणे व संवर्धन करणे सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. यासाठी केवळ शासकीय यंत्रणाच जबाबदार नाहीत.
   कार्यकारी अभियंता श्री. टी. पी. चिनावलकर यांनी प्रास्ताविकात जलजागृती सप्ताहानिमित्ताने जलजागृती करण्यासाठी या सप्ताहात घोषवाक्यस्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, आयोजित केल्या जाणार असून जलजागृती कार्यात जनतेचा सहभाग, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, मोठया प्रमाणावर घेण्यात येणार आहे. या सप्ताहात घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे नियोजन त्यांनी सादर केले. व उपस्थितांना  जलप्रतिज्ञा दिली.
या समारंभात विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. अपूर्वा वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता आदिती कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांचा समारोप झाला.
समारंभाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जलपूजनाव्दारे झाले. जिल्हयातील सर्व नदयांचे आणण्यात आलेले पाणी यावेळी एका मंगल कलशात एकत्र करण्यात आले व त्याचे पूजन करण्यात आले.
०००

No comments:

Post a Comment