जळगाव, दि. 22 - दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण
करीत आहे. त्यामुळे आजच पाण्याचे नियोजन केले तरच आगामी पिढीला पाणी मिळेल. यासाठी
पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब अडवून तो जमिनीत जिरविला पाहिजे. यासाठी
नागरीकांमध्ये जनजागृती महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जलदिंडीच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.
जागतिक जलदिनानिमित्त तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जैन इरिगेशन
सिस्टीम्स, भवरलाल ॲण्ड
कांताबाई जैन फाऊंडेशन, गांधी रिसर्च
फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जलसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जलसप्ताहाची सुरुवात महात्मा गांधी उद्यानापासुन भव्य
जलदिंडीने झाली.
जलदिंडीच्या समारोपावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, पाणी हेच जीवन आहे. प्रत्येकाने
पाण्याचे महत्त्व समजून घेवून इतरांनाही ते पटवून द्यायला हवे. जलदिंडीच्या सुरवातीला घेतलेली जल बचतीची प्रतिज्ञा सर्वांनी
पाळून पाण्याचा जपून वापर करावा असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी दलिचंदजी जैन यांनीही जलबचतीचा संदेश देताना ते म्हणाले की, जैन इरिगेशन
नेहमी पाण्याच्या बचतीबाबत सजग
असते. आपण सर्वांनी कमीत कमी पाण्याचा वापर
करावा व इतरांनाही पाणी बचतीचे महत्व सांगण्याचे आवाहन केले. विनोद रापतवार यांनी सुत्रसंचालन केले. तर हर्षल पाटील यांनी आभार मानले.
कलश पूजन, प्रतिज्ञा वाचनाने
महात्मा गांधी उद्यानापासून जलदिंडीची सुरवात
महात्मा गांधी उद्यानापासून जलदिंडीला
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी
जल प्रतिज्ञा वाचुन दाखविली यानंतर त्यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर
गणेश सोनवणे, दलिचंद जैन, तापी
महामंडळाचे कार्यकारी
अभियंता तुषार चिनावलकर, यांचेसह पाटबंधारे विभागाचे व जैन इरिगेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि जळगावकर नागरीक, विद्यार्थी मोठया
संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी
निंबाळकर यांनी पाण्याच्या कलशाची पालखी स्वतः खांद्यावर घेऊन जलदिंडीचे प्रस्थान केले. या जलदिंडींचा समारोप भाऊंचे उद्यान,
काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आला.
जागतिक
जलदिनानिमित्त जलसंपदा मंत्री ना. महाजन यांनी दिल्या जळगावकरांना शुभेच्छा
जागतिक जल दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा व
वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन
यांनी जळगावकरांना शुभेच्छा दिल्या. विधान मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु
असल्याने इच्छा असूनही या कार्यक्रमास उपस्थित राहता येत नसल्याने त्यांनी
शुभेच्छा संदेश पाठविला. या संदेशाचे वाचन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी
केले.
सजविलेल्या बैलगाडी, ट्रॅक्टरवरील फलकांव्दारे प्रबोधन
जलदिंडीमध्ये ट्रॅक्टरवर
भल्या मोठ्या कलशाच्या माध्यमातून सजावट करण्यात आली होती. दुसऱ्या ट्रॅक्टरवर
पेट्रोल पंपासारखा पाण्याचा पंप सजविण्यात आला होता. बैलगाडीवर महात्मा गांधीजी
यांचा पाणी बचतीचा संदेश होता. तसेच या जलदिंडीत शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी
झाले होते. त्यांनीही हाती विविध फलक घेऊन पाणी बचतीबाबत प्रबोधन केले.
स्केटींग, लेझीम पथक ठरले जलदिंडीचे खास आकर्षण
जलदिंडीमध्ये सहभागी झालेल्या ए. टी. झांबरे विद्यालयाचे लेझीम पथक, अनुभूती इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोलाच्या
तालावर पावली नृत्य केले. सेंट जोसेफ स्कुलचे
स्केटींग पथक जलदिंडीचे खास आकर्षण ठरले. तसेच शिरसोली
येथील संत रूपलाल महाराज भजनी मंडळानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जळगावकरांचा उत्स्फूर्त सहभाग
जलदिंडीमध्ये जळगावातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जल संवर्धनासाठी
उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यात तापी
महामंडळाचे अधिक्षक अभियंता सतीश काळे, कार्यकारी
अभियंता तुषार चिनावलकर, प्रशांत मोरे, श्री. गावीत, श्री. पी. पी. वराडे, श्री. विचवे, शिवाजी भोईटे, सुनील अहिरे यांच्यासह अनुभूती
इंटरनॅशनल स्कूल, अनुभूती
इंग्लिश मिडीयम स्कूल, रूस्तमजी
इंग्लिश मिडीयम स्कूल, ए. टी. झांबरे
विद्यालय, सेंट जोसेफ, पर्यावरण शाळा, जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचे खेळाडू, सकल जैन श्री संघ, जैन नवयुवक
मंडळ, युवाशक्ती फाऊंडेशन, नीर फाउंडेशन, परिवर्तन, रोटरी जळगाव ईस्ट, लायन्स क्लब
यांनी जलदिंडीत सहभाग घेतला.
वाहतुक पोलिसांनी केले वाहतूकीचे नियोजन
जलदिंडीत जळगावकरांनी मोठया प्रमाणात उपस्थिती
राहून प्रतिसाद दिला. जलदिंडीची
पहिले टोक जिल्हाधिकारी कार्यालय तर शेवटचे टोक महात्मा गांधी उद्यान असे स्वरूप
होते. त्यामूळे वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या सुचनेनुसार जळगाव शहर वाहतुक शाखेचे पोलिस
उपनिरीक्षक सागर शिंपी, श्री. फरताळे यांच्या
मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र उगले, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजु मोरे, प्रकाश परदेशी,
संतोष शिंदे, पोलिस
कॉन्स्टेबल अजित तडवी, मदन पावरा यांनी चौका-चौकात थांबून योग्य नियोजन केले.
सहभागी झालेल्यांनी घेतली जल प्रतिज्ञा
पाणी हे जीवन असून,त्याचा वापर गरजेपुरता व
काटकसरीने करेन. मी पाण्याचा
अपव्यय व गैरवापर करणार नाही. नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीन. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे, ही माझी सामाजिक बांधिलकी मानून, त्याचे सदैव पालन करीन अशी जल प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली.
000
No comments:
Post a Comment