Thursday, 8 March 2018

खान्देशातील सर्वात मोठ्या कृषि महोत्सवाचे सागर पार्क मैदानावर आयोजन : महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षांचे हस्ते होणार उद्घाटन



     जळगाव, दि. 7 - शासनाचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देशातील सर्वात मोठ्या कृषि महोत्सवाचे येथील सागर पार्क मैदानावर आजपासून (8 मार्च) आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कृषि महोत्सवाचे उद्घाटन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील यांच्या हस्ते 8 मार्च, 2018 रोजी दुपारी 4 वाजता सागर पार्क मैदानावर होणार आहे.
            कृषि क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतमालाची उत्पादकता वाढावी. यासाठी शेतकऱ्यांना चर्चासत्र व परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावे. शेतकऱ्यांनी पिकविलेला चांगल्या दर्जाचा शेतमाल ग्राहकांना खरेदी करता यावा. यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
            या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे प्रथम नागरीक महापौर ललीत कोल्हे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, उपमहापौर गणेश सोनवणे, समाजकल्याण समिती सभापती प्रभाकर सोनवणे, शिक्षण समिती सभापती पोपट (तात्या) भोळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती रजनी चव्हाण, कृषि महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. दिवेकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
            या महोत्सवात कृषि क्षेत्राशी संबंधित शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, कृषीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, सेंद्रिय शेतमाल विक्रीचे दालन, धान्य महोत्सव, खरेदीदार विक्रेता संमेलन, शेतकऱ्यांसाठी परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान, खाद्य महोत्सव, महिला बचतगटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे दालन, आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीची सोय याबरोबरच ड्रोनद्वारे पीकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक ही प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या प्रदर्शनात शेती क्षेत्राशी निगडील दोनशे हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
            हे प्रदर्शन 8 ते 12 मार्च या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहेत. या प्रदर्शनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी व नागरीकांनी भेट देऊन लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
000


No comments:

Post a Comment