Monday, 19 March 2018

चाळीसगाव येथे 7 एप्रिलपासून शासकीय योजनांची जत्रा व कृषि महोत्सवाचे आयोजन शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर





                जळगाव, दि. 19 - शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मोठया प्रमाणात मदत होणार आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनांची माहिती नागरीकांना देऊन  त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले.
            चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरीक यांना प्रशासकीय पातळीवर मिळणारे दाखले व मिळणाऱ्या योजनांचा लाभ अधिक सुलभ व सहजगत्या मिळावा. यासाठी तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून महाराजस्व अभियान विस्तारीत समाधान योजनेतंर्गत 7 ते 10 एप्रिल, 2018 या कालावधीत येथील सिताराम पहिलवान यांचा मळा, लक्ष्मीनगर, चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा व कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे व कृषि महोत्सवाच्या आयोजनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांचा उपस्थितीत आज पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजीत भांडे पाटील, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक साहेबराव पाटील, तहसीलदार कैलास देवरे, मंदार कुलकर्णी, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांचेसह शासनाच्या विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            शासकीय योजनांच्या जत्रे मध्ये कृषी, दुग्धव्यवसाय, पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपन्यांची बियाणे व खते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 200 हून अधिक कंपन्यांचा सहभाग, औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपन्यांची अवजारे, शेती तज्ञांकडून शेतीविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन, प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
            त्याचबरोबर या जत्रेत नागरीकांना शासनाच्या 43 विभागांच्या 160 हून अधिक योजनांचा लाभ घेता येणार आहे. शासकीय योजनांची माहिती देणारे 100 पेक्षा अधिक स्टॉल असणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या 27 हून कार्यालयांचा या जत्रेस सहभाग असणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ व माहिती समुपदेशन यांची सुविधा याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पहिलीपासून ते पदवीधर विद्यार्थ्यांना शालेयपोयोगी दाखले मिळण्याची सुविधा असणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरीक, विधवा महिलांना आवश्यक असणारे दाखले व योजनांचा लाभ याठिकाणी देण्याची सुविधा असणार आहे. शेतकऱ्यांना संगणकीय सातबारा देण्याची सुविधा, युवक व महिलांना माहितीचे स्वतंत्र दालन याठिकाणी असणार आहे. महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी. तसेच या जत्रेत जिल्ह्यातील सर्व  शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आमदार उन्मेष पाटील यांनी बैठकीत दिली.
            तसेच या जत्रेत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन, विद्या प्राधिकरण, पुणे, विभागीय विद्या प्राधिकरण, नागपुर आणि कै. वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ संचलीत सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलीटेक्नीक, भोरस, ता. चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 43 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तसेच 9 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता सतपाल महाराज यांचे ग्रामविकास सप्तखंजेरी प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचा तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार उन्मेष पाटील यांनी केले.
000

No comments:

Post a Comment