Monday, 2 April 2018

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यशाळा संपन्न व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न होणे आवश्यक - शिवाजी दिवेकर

          जळगाव, दि. 2 - व्यसन ही एक सामाजिक समस्या असून या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करुन व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी वचनबध्द होऊ या. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर  यांनी केले.
     जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व कोटपा (सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम) 2003  या विषयावर हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरुन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. दिवेकर बोलत होते.
            याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण,  समिती सदस्य तथा सहायक धर्मदाय उपायुक्त गजानन जोशी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त् एम. डी. शहा, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण आदि उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना श्री. दिवेकर पुढे म्हणाले की, सद्यपरिस्थितीमध्ये व्यसन ही एक भयानक समस्या आहे. देशातील अनेक व्यक्ती विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेल्या आहेत. त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे हे कठीण काम असले तरी अशक्य नाही असा ठाम विश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे. तसेच व्यसनांच्या दु्ष्यपरिणामांची जाणीव सबंधितांना करुन देणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक व्यक्तीने मी व्यसन करणार नाही व करु देणार नाही असा निश्चय करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होणे आवश्यक असून यासाठी तंबाखू सेवन मुक्त शाळा हा उपक्रम गावपातळीवर राबविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
         या कार्यशाळेत  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन भारती, डॉ. संपदा गोस्वामी यांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा) 2003 कायद्यातील विविध कलमांच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता विविध विभागातील अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार व जबाबदारीबाबत सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. तसेच या कायद्याची अंमलबजावणी तालुका व गाव पातळीवर प्रभावीपणे होण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांची माहितीही यावेळी उपस्थितांना दिली.
    कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समुपदेशक दादाजी सोनवणे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. जयकर यांनी मानले.
     कार्यक्रमास जिल्हातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुकेश पाटील,  रुचिका साळुंखे, राहूल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
                                                                  000

No comments:

Post a Comment