जळगाव दि. 14 :-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला
‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश त्यांना अपेक्षीत असल्याप्रमाणे अजूनही आपण
स्विकारलेला नाही. त्यांनी अन्यायाशी संघर्ष करण्यास सांगितले असतांना आपण वेगळेच
संघर्ष करतांना दिसत आहे. डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे साहित्य समजून
घ्यावे. बाबासाहेब समजून घ्या, विचार करायला शिका, चिकित्सक व्हा आणि
बाबासाहेबांना अपेक्षीत असलेला माणूस व्हा. असे भावपूर्ण उद्गार येथील जेष्ठ
नाट्यकर्मी आणि साहित्यीक शंभू पाटील यांनी काढले.
सामाजिक न्याय
विभाग आयोजित सामाजिक समता सप्ताह समारोपप्रसंगी ‘समकालीन काळ आणि डॉ. बाबासाहेब
आंबेडकर’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते सभागृहास मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आमदार संजय सावकारे होते. व्यासपीठावर उद्घाटक
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, समाज
कल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड,
योगेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री. शंभू पाटील
पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी ज्ञान आणि विद्येवर विश्वास ठेवला. जगात वंदनीय ठरावी
अशी राजघटना लिहिली. आपण विचार करायला शिकले पाहिजे. प्रश्नांची चिकित्सा करा.आपले
दू:ख दूर करायला दुसरे कोणी येईल अशी वाट न पहाता आपणच पुढाकार घेवून आपले दु:ख
दुर करा. बाबासाहेबांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यापेक्षा आता
परिस्थती चांगली आहे. शिक्षणाच्या वेगवेगळया योजना आहेत. त्याचा लाभ घ्या.
बाबासाहेबांनी त्याकाळी शेतकरी, अल्पसंख्यांक इत्यादीविषयी आपले विचार शोध
प्रबंधातून मांडले आहेत. त्याचा त्यांनी उहापोह केला.
अध्यक्षीस भाषणात
आमदार संजय सावकारे म्हणाले, शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. सामाजिक समता वाढत आहे.
काळ बदलला आहे. डॉ. बाबासाहेबांमुळे आपल्याला मुलभूत हक्क मिळालेले आहेत. आपण सर्व
देशाच्या विकासाच्या प्रमुख प्रवाहात आलेले आहोत. आपण आपले विचार करण्याची शक्ती
वाढवा. आपल्या बुध्दीने समाजात आचरण ठेवा. आपल्या मनावर असलेले गुलामगिरीचे जोखड
बाजूला सारुन गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर या. स्वत:ची आणि देशाची प्रगती
करण्याची इच्छाशक्ती प्रकट करा, असेही ते शेवटी म्हणाले.
प्रास्तविकात जिल्हा परिषदेच्या समाज
कल्याण अधिकारी अनेक राठोड यांनी 8 ते 14
एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहात घेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती
उपस्थितांना दिली.
महामानवास
अभिवादन लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कार्यावर
आधारीत महामानवास अभिवादन हा लोकराज्य मासिकाचा विशेषांक काढण्यात आला.
या अंकाचे प्रकाशन आज या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते
करण्यात आले. उपस्थितांना लोकराज्य हा अंक मोफत वितरीत करण्यात आला.
प्रारंभी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील
यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन, प्रतिमा पुजनाने सामाजिक समता सप्ताह समारोप समारंभाच्या कार्यक्रमाचे
उद्घाटन झाले.
जिल्हा
परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
उज्वलाताई पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. समाज कल्याण विभागाचे सहायक
आयुक्त खुशाल गायकवाड यांनी आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर
यांचे तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी
योगेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, गणेश बोरसे, सभापती
प्रभाकर सोनवणे यांचे व आर. डी. पवार यांनी शंभू पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून
स्वागत केले.
कार्यक्रमाची सांगता जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय कराळे
यांच्या कवीता वाचनाने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद ढगे यांनी केले. कार्यक्रमास पसिरातील नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment